माटुंगा ते दादर दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे एकाच वेळी तीन लोकल ट्रॅकवर थांबलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता, नाराजी आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. कामावर, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या हजारो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवासी तर कंटाळून धोकादायक मार्गांचा अवलंब करत असून थेट लोकलमधून उतरून ट्रॅकवर चालत आहेत. ही बाब अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर, हिंदमातासह मोरारजी पूल पाण्याखाली, Video
रेल्वे प्रशासनाने प्राथमिक माहिती देताना स्पष्ट केलं की, पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाईल. मात्र, पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने नेमकी वेळ सांगता येत नाही. पाणी उपसण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तर, उपाययोजना समाधानकारक नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रवासी नाराजी व्यक्त करत म्हणाले, "आम्ही गेली 30 मिनिटांपासून लोकलमध्ये अडकलेलो आहोत. ना काही सूचना मिळत आहेत, ना मदतीसाठी कोणी येतंय. प्रत्येक वर्षी अशीच अडचण होते. त्यात काहीच सुधारणा होत नाहीत."
फक्त रेल्वेच नव्हे, तर रस्त्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील अनेक लो-लाईंग भागांत पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्य रस्ते, जंक्शन आणि महामार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये वाहनं बंद पडल्याने ट्रॅफिक अधिकच वाढलं आहे. या परिस्थितीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा आणि अन्य आपत्कालीन सेवांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसामुळे निर्माण झालेल्या या समस्यांचा सामना करताना खंबीर राहण्याचा प्रयत्न केला आहे. पण, प्रशासनाने यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.





