कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल ही जगप्रसिद्ध आहे. कित्येकजण वर्षानुवर्षे कोल्हापुरी चपलाचा व्यवसाय करत आले आहेत. मात्र, आपला वडिलोपार्जित कोल्हापुरी चपलाचा व्यवसाय सोडून दुसऱ्या क्षेत्रात आपल्या नाव कमावण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील दोन भाऊ सध्या करत आहेत. कोल्हापूरची विशेष ओळख असणाऱ्या मिसळ विक्रीचा व्यवसाय या भावंडांनी उत्तम पद्धतीने चालवला आहे. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात शिव मिसळ या नावाने मिळणारी त्यांची मिसळ खाद्यप्रेमींची विशेष पसंती बनून गेली आहे. आज जाणून घेऊयात, त्यांच्या जिद्दीची ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
कोल्हापुरात पुरुषोत्तम कारंडे हे गेली 30 ते 40 वर्षे कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करून त्यावर उदरनिर्वाह करत होते. कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी परिसरात त्यांचे चप्पलचे छोटेसे दुकान होते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आणि अतिक्रमणाच्या कारणास्तव कारंडे यांचे चप्पलचे दुकान बंद करावे लागले. त्यावेळी पुरुषोत्तम यांची मुले संजय आणि प्रशांत हे दोघेही क्षण घेतच बाहेर नोकरीही करत होते. मात्र, स्वतःचा एक व्यवसाय असावाच, या उद्देशाने मित्रांच्या साहाय्याने 2009 मध्ये संजय आणि प्रशांत या दोघा भावांना मिळून शिव मिसळ नावाने कोल्हापुरी मिसळचा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हापासून आजतागायत दोघांनी मिळून आपल्याकडील मिसळला कोल्हापुरातील एक प्रसिद्ध मिसळ बनवले आहे.
काय आहे विशेष -
सध्या मिसळच्या नावाखाली बऱ्याचदा मिसळ थाळी किंवा अजून बरेच प्रकार खायला दिले जातात. त्यामध्ये गुलाबजाम, पापड, सोलकडी असे पदार्थ मिसळबरोबर खायलाच देऊन त्याची किंमत वाढवतात. मात्र, पहिल्यापासूनच कारंडे यांच्याकडे मटकी, बटाटा भाजी, शेव चिवडा, कांदा-लिंबू, मिसळची पातळ भाजी आणि पेटीपाव इतकेच घटक दिले जातात. मिसळमध्ये जवळपास सर्वत्र फक्त उकडलेला बटाटा देण्याची पद्धत आहे. मात्र, कारंडे यांच्याकडे मिसळमध्ये बटाटा, मटकी, चटणीसह विविध घटक असलेली विशेष पद्धतीने बनवलेली भाजी वापरली जाते, असे संजय यांनी सांगितले आहे.
कशी बनवली जाते ही मिसळ?
मिसळ बनवताना पातळ भाजी ही घरगुती मसाला पासूनच बनवली जाते. त्यामध्ये आले-लसूणची पेस्ट, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी, मिरची पूड, धनेपुड, जिरेपूड, असे वेगवेगळे मसाले वापरून मिसळची पातळ भाजी बनवली जाते. तर मटकीमध्ये चटणीसह विविध मसाले टाकून त्याची सुकी उसळ बनवून घेतली जाते. ही मटकीची लाल उसळ आणि उकडलेला बटाटा यांचे मिश्रण बनवून ती मिसळमध्ये वापरली जाते. तर मिसळवर मलईयुक्त घट्ट दही देखील दिले जाते, अशी माहिती संजय कारंडे यांनी दिली आहे.
संजय यांच्यासोबत त्यांचे भाऊ प्रशांत, आई सुरेखा कारंडे यादेखील या ठिकाणी व्यवसाय सांभाळतात. दोघे भाऊ आणि आईच्या कष्टामुळेच कोल्हापूरच्या एका स्पर्धेमध्ये मिसळ सम्राट म्हणून विजेतेपद देखील त्यांच्या मिसळने मिळवले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या मिसळ सेंटरवर खवय्यांची रेलचेल असते. या वेळेत साधारण 400 प्लेट मिसळ विक्री रोज या ठिकाणी होत असते. तसेच रोज बाहेरच्या पर्यटकांसह नवनवीन खवय्येसुद्धा या ठिकाणी येऊन या मिसळचा आस्वाद घेत असतात. तुम्हालाही याठिकाणी मिसळचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्त्यावर जाऊन मिसळची चव चाखू शकतात.
संपर्क (संजय कारंडे) - 9665643434
पत्ता - शिव मिसळ, दसरा चौक, कोल्हापूर - 416002





