राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागला आहे. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळांची नाराज आहेत. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. काल, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. तर, दुसरीकडे अजितदादा नॉट रिचेबल नसल्याने चर्चांना उधाण आहे.
advertisement
अजितदादा नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत प्रचंड गंभीर असतात. सभागृहातल्या कामकाजात हे आवर्जून असतात. आता, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. अजित पवारांकडे मागण्यांचे निवेदन घेऊन येणाऱ्यांची संख्याही चांगलीच असते. मात्र, अजित पवार हे मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
भुजबळ नाराज...
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली. त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली. ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी संघटनाही नाराज आहेत. आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
