बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवानंतर आता भाजपने आक्रमक सूर लावला आहे. या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनच्या पॅनलने 14 जागा तर महायुती समर्थित 'सहकार समृद्धी' पॅनलने 7 जागांवर विजय मिळवला. ठाकरे गट-मनसेच्या पॅनलचा धुव्वा उडाला.
भाजपचे मु्ंबई अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले की, बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल हा भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि "पत" आणि "पेढी"साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला असल्याचे शेलार यांनी म्हटले. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचेही त्यांनी म्हटले.
advertisement
हा शुभ संकेत, मुंबई आमचीच!
आशिष शेलार यांनी म्हटले की, पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत असे त्यांनी नमूद केले.
बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या "निर्भय"वक्त्यांपर्यंत सगळे उघडे, नागडे झाले असल्याचे शेलार यांनी म्हटले. मुंबईकर ही आमचाच असून मुंबई ही आमचीच असल्याचे शेलारांनी म्हटले.