सातारा : पावसाळ्यात बाजारात छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पला, मोबाईल कव्हर, इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते. अनेकजण गेल्या वर्षीची छत्री दुरुस्त करून घेतात किंवा यंदा घेतलेली छत्री मोडली की ती पुन्हा दुरुस्त करून वापरतात. त्यामुळे पावसाळ्यात छत्री व्यावसायिकांचा चांगला नफा होतो.
साताऱ्यातील गोल बागेजवळ गेल्या 35 ते 40 वर्षांपासून पवार कुटुंबीयांचा छत्री दुरुस्त करण्याचा व्यवसाय आहे. आता त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. अगदी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे ते हे काम करतात. या व्यवसायावर त्यांचं घर चालतं, शिवाय मुलांचं शिक्षणही यावरच होतं.
advertisement
हेही वाचा : दिव्यांगावर मात! ते हॉटेल चालवतात जोमात, त्यांच्या हातची चव चाखायला येतात खवय्ये
मनीषा पवार आणि त्यांचे पती ही पवार कुटुंबीयांचा हा व्यवसाय सांभाळणारी तिसरी पिढी. गेली 15 ते 16 वर्षे ते गोल बागेजवळ पारंपरिक पद्धतीनं छत्री दुरुस्त करतात. अतिशय कमी किंमतीत छत्री दुरुस्त करून मिळत असल्यामुळे त्यांच्याकडे नागरिकांची गर्दी पाहायला मिळते.
पवार दाम्पत्य पावसाळ्याचे 4 महिने हे काम करतात आणि उरलेलं वर्ष कपडे-भांडी धुवून आपलं घर सांभाळतात. घरची परिस्थिती हलाखीची, शिवाय कुटुंबाची जुनी परंपरा जपण्यासाठी ते न लाजता फुटपाथवर भरपावसात आपला व्यवसाय सांभाळतात. विशेष म्हणजे लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी छत्री ते अजिबात मशीनचा आधार न घेता पारंपरिक पद्धतीनं शिवून दुरुस्त करतात. यातून त्यांना दिवसाकाठी जवळपास दीड ते 2 हजार रुपये सहज मिळतात. म्हणजे 4 महिन्यात त्यांची लाखोंची कमाई होते.





