नांदेड: देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पाहण्यास मिळाला. उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली गावात ढगफुटीसारखा पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. भुस्खलन झाल्यामुळे धराली गावातील अनेक घरं आणि बिल्डिंग जमिनीखाली गाडली गेली आहेत. अशातच या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील ११ यात्रेकरू अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व ११ यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
आज 5 ऑगस्ट 2025 रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून, ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत.
(Uttarkashi Cloud burst: 7 सेकंदात संपूर्ण गाव उद्ध्वस्त! थरकाप उडवणारे ढगफुटीनंतरचे PHOTO)
उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी 01 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथून निघाले होते, त्यांचा संपर्क झाला असून ते सर्व सद्यस्थितीत घटनास्थळापासून 150 किमी दूर असून सर्व 11 जण सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास सचिन पत्तेवार यांनी कळविले आहे. त्या अकरा जणांची नावे खालील प्रमाणे आहेत.
हे 11 यात्रेकरू अडकले
1. सचिन पत्तेवार (वय 25)
2. शिवचंद्र सुकाळे (वय 30)
3. शिवा कुरे (वय 32)
4. स्वप्निल पत्तेवार (वय 25)
5. शिवा ढोबळे (वय 28)
6. धनंजय ढोबळे (वय 26)
7. नागनाथ मुंके (वय 28)
8. देवानंद गौण्डगे (वय 24)
9. अमोल कुरे (वय 28)
10. सोमनाथ चंदापुरे (वय 29)
11. देवानंद चंदापुरे (वय 27)
उत्तर काशी इथं घडलेल्या परिस्थितीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे लक्ष ठेवून असून आवश्यकते नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील अजून कुणी उत्तराखंड इथं अडकून पडले असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.