वर्धा : एखाद्या महिलेने जर ठरवले तर ती काहीही साध्य काही करु शकते. हेच वर्ध्यातील वैशाली पाटील यांनी दाखवून दिलं आहे. 2007 मध्ये त्यांनी गृह उद्योग सुरू केला. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत दर्शना महिला बचत गटाची सुरुवात केली. वैशाली यांनी महिलांना गटाच्या माध्यमातून आपण आपल्या पायावर कसं उभं राहू शकतो यासंदर्भात जागृत केलं. नमकीन आणि मिठाई अशा प्रकारचे अनेक पदार्थ बनवून विक्री होऊ लागले परंतु लॉकडाऊन पासून व्यवसाय ठप्प पडला. मात्र वैशाली यांच्या हातच्या लंबी रोटी बनवण्याच्या कलेने परिस्थिती रुळावर आली. इतकंच नाही तर आता जिल्ह्यातच नाही तर बाहेर जिल्ह्यात देखील लंबी रोटीला पसंती मिळाल्याने दुकाने स्थापन करण्यात आली. यातून 260 महिलांना रोजगार प्राप्त झालाय.
advertisement
नेमका कसा होता प्रवास?
2007 साली आमच्या महिला बचत गटाची स्थापना झाली आणि तेव्हाच आमच्या गृहउद्योगाचीही सुरुवात झाली. चिवडा, चकली, अनारसे, करंज्या, शंकरपाळे आणि अनेक नमकीन असे पदार्थ आम्ही बनवून विक्री करू लागलो. प्रदर्शनीच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पदार्थ पोहोचले. 2018 पर्यंत व्यवसाय चांगला सुरू होता. परंतु कोरोना नावाचं नवं संकट आलं आणि घरोघरी वस्तू,पदार्थ पोहोचणे बंद झाले. विक्रीसाठी लोकं आम्हाला घरी येऊ देईना. तेव्हा जवळजवळ आमच्या दीडशे दोनशे महिला घरी बसल्या, मात्र घरी राहून काय करणार? तेव्हा कळलं की सगळेजण घरी राहून कल खाण्याकडे वाढलाय आणि माझ्या हातात लंबी रोटी बनविण्याची कला होती. 6 महिने रोटी घरी बनवल्या आणि फुकट वाटल्या. नंतर आम्ही दयाल नगरमध्ये 1 स्टॉल लावला आणि आमच्या लंबी रोटीला नागरिकांनी पसंत केलं आम्हाला ऑर्डर्स येत गेल्या. त्यानंतर एकच दुकानावर न राहता आम्ही वर्धा शहरातच नाही तर जिल्ह्यात एकेक करून आज 7 दुकाने स्थापन केलीत. आणि चंद्रपूरमध्येही 4 दुकाने आहेत, असं वैशाली पाटील सांगतात.
IT मधील नोकरी सोडली अन् सुरू केला व्यवसाय, आता वर्षाला 15 लाखांची कमाई
अनेक अडचणींचा केला सामना
हे सगळं सुरू करत असताना वैशाली आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेक महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आमचे 2 दुकाने तोडफोड झाली, जाळून टाकली, मारझोड भांडणे झाली. कारण व्यवसाय म्हंटलं की स्पर्धा आलीच,पण हार न मानता आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवले. सर्व महिलांनी मेहनतीने ताकद लावली. आज मेहनतीचे फळ मिळाले असून आमचे दुकानाची भरभराट झालीय, असं वैशाली सांगतात.
photos : गरिबांच्या मुलांच्या पंखांना दिलं बळ, शिक्षिकेच्या कौतुकास्पद कार्याची प्रेरणादायी गोष्ट!
तब्बल 260 महिलांना रोजगार
वैशाली पाटील यांच्या बचत गटाचे लंबी रोटीचे जिल्ह्यात 7 तर जिल्ह्याबाहेर 4 दुकाने असून, वेगळा गृहउद्योग देखील सुरळीत सुरू आहे. त्यामुळे एकूण तब्बल 260 महिला काम करत असल्याचं त्या संगतात. इतकंच नाही तर 2025 पर्यंत राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील व्यवसाय सुरू करून 500 गरजू महिलांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले.





