ही घटना भांडुपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव दीपक पिल्ले (17) असे आहे. दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घराकडे जात होता. मात्र, रस्त्याच्या कडेला महावितरणची हाय-टेन्शन वायर खुली अवस्थेत पडलेली होती. पावसामुळे रस्त्याला चिखल आणि पाणी साचले होते. या वायरच्या संपर्कात येताच दीपकला जोरदार शॉक बसला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कानात हेडफोन घालून चालत होता. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर दिलेला इशारा त्याच्या कानावरच गेला नाही. काही लोकांनी त्याला मोठ्याने हाक मारून धोका टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र हेडफोनमुळे त्याला काहीच ऐकू आलं नाही आणि तो थेट विजेच्या तारेच्या संपर्कात गेला.
याच ठिकाणी अनेक नागरिक प्रवास करत असतात. स्थानिकांनी जागरूकता दाखवत, इतरांना बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. मात्र दीपकला वाचवणे शक्य झाले नाही.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. खुल्या तारांमुळे जीवितहानी झाल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.