मध्य रेल्वेने प्रजासत्ताक दिनापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा आणि पनवेल मार्गावर एसी लोकलच्या एकूण 14 फेऱ्या सुरू केल्या आहेत. या एसी लोकलसाठी काही नियमित लोकल फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच प्रवासीसंख्या अधिक असलेल्या हार्बर मार्गावर गर्दीचा ताण वाढल्याचे दिसत आहे.
लोकल सेवांवर वेळापत्रकाचा परिणाम
विशेषतहा गर्दीच्या वेळेत एसी लोकल स्थानकांवर अधिक वेळ थांबत असल्याने मागे असलेल्या लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. एसी लोकलचे दरवाजे उघडणे आणि बंद होण्यासाठी लागणारा वेळ तसेच प्लॅटफॉर्मवरील वाढलेली गर्दी यामुळे विलंब होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
advertisement
एसी लोकल सेवा ही नक्कीच चांगली बाब असली तरी हार्बर मार्गावरील प्रवासीसंख्या लक्षात घेता तिचे नियोजन अधिक प्रभावी पद्धतीने होणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत. गर्दीच्या वेळेत एसी लोकलच्या फेऱ्या कमी करून त्या कमी वर्दळीच्या वेळेत चालवण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी होत आहे.
लोकल सेवांतील बदल तात्पुरताच
दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने ही परिस्थिती तात्पुरती असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुटी असल्याने रविवारी लागू असलेल्या वेळापत्रकानुसार लोकल सेवा चालवण्यात आल्याचे सांगण्यात आले. एसी लोकलच्या दरवाजे उघडणे-बंद होण्यात कोणताही विलंब होत नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवासीसंख्या लक्षात घेऊन सेवा सुरळीतपणे चालवली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली
