भिवंडी: शहरातील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल हा अपघाताचा हॉटस्पॉट ठरला आहे. बुधवारी सायंकाळी या पुलावर दोन भरधाव कारमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार 50 फूट उंचीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. या अपघातात तर एक कारचालक गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भिवंडीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर घडला. अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी (रा. मिल्लत नगर) आपली होंडा सिटी कार (MH 43 AF 1601) भरधाव वेगाने चालवत होता. भादवड येथील अरिहंत सिटीसमोर अचानक त्याची गाडी समोरून येणाऱ्या महिंद्रा XUV (MH 48 BH 8198) कारवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. होंडा सिटी कारमधील चालक अब्दुल्ला गंभीर जखमी झाले. सुदैवाने, महिंद्रा XUV कारमधील एअरबॅग उघडल्याने त्यातील चालक किरकोळ दुखापतीसह बचावला.
advertisement
या अपघातामुळे होंडा सिटी कार जागेवरच उलटली. त्याचवेळी मागून वेगाने येत असलेली दुचाकी (क्र. MH 05 9845) या कारवर आदळली. धडकेमुळे दुचाकीस्वार राहुल दादाराम तरे (वय ३२, रा. अंजूर) उड्डाणपुलावरून थेट 50 फूट खाली फेकला गेले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी कारचालक अब्दुल्ला याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे उड्डाणपुलावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले
भिवंडीत रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, या मार्गावर भरधाव वेगाने वाहने धावल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी प्रशासनाला याविरोधात तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. जर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.