निसर्गसंपन्न वारसा लाभलेल्या राणीच्या बागेत गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा हा उत्सव 29 व्या वर्षात पदार्पण करत असून दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित रचना सादर केल्या जातात. मागील वर्षी ‘राष्ट्रीय प्रतीके’ ही संकल्पना होती तर त्याआधी ‘अॅनिमल किंगडम’, ‘जलचर जीवन’, ‘आमची मुंबई’ आणि ‘कार्टून्स’ अशा विविध विषयांवर पुष्पोत्सव साजरा करण्यात आला होता.
advertisement
मुंबईकरांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि निसर्गाशी नाते दृढ करणे हा या उत्सवामागील मुख्य उद्देश आहे. या पुष्पोत्सवात फुलझाडांच्या विविध प्रजाती, फळझाडांची रोपटी, औषधी वनस्पती तसेच आकर्षक सजावटीची झाडे पाहायला मिळणार आहेत. यासोबतच उद्यानविषयक साहित्य, सेंद्रिय खते, कुंड्या व लागवडीसाठी आवश्यक साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
या पुष्पोत्सवाची तयारी सुमारे तीन महिन्यांपूर्वीपासून सुरू करण्यात आली आहे. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे आणि ठरलेल्या संकल्पनेनुसार मांडणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
यंदाच्या पुष्पोत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मायक्रो ग्रीन्स, वनस्पती संवर्धन (प्रोपागेशन), बोन्साय, अक्वास्केपिंग, सेंद्रिय खतनिर्मिती, झाडांची देखभाल तसेच कलात्मक पुष्परचना अशा विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी जपान, मलेशिया, कॅनडा व मॉरिशस येथील राजदूतांसह अनेक मान्यवरांनी या पुष्पोत्सवाला भेट दिली आहे.
निसर्गप्रेमींसाठी हा पुष्पोत्सव एक अविस्मरणीय अनुभव ठरणार असून मुंबईकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





