आझाद मैदानामधून मनोज जरांगेंनी संध्याकाळी मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
'देवेंद्र फडणवीस यांचं हे असं आहे की, उंटावरून बसून काडीने औषध लावण्याचा प्रकार आहे. आता उंटावर बसून खालच्या माणसाला औषध लागणारच नाही. जर ते उंटावरून खाली उतरले तर औषध लागेल. देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की, शिव्याने नाहीतर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. पण काय कर्तृत्व आहे फडणवीस साहेबांचं सांगाच. धनगराच्या गाडीत लाकूड घातलं. परत म्हणाल शिव्या दिल्यात. खेड्याची भाषा आहे, धनगरांना आरक्षण दिलं नाही. तुम्ही जेवढी महामंडळ उघडली एकाला रुपया दिला नाही. एकही भरती केली नाही. तुम्ही आता काय दूर नाही, थेट मला इथूनच दिसतात. एक माईक तुम्ही लावा, एक भोंगा आम्हाला द्या. आणि तुमचं कर्तृत्व काय आहे, धनगराचं वाटोळं केलं, केकाडी समाजाला आरक्षण, विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात ओबीसी आहे, खान्देशात एसटी आहे. एकाच राज्यात एक जात तीन प्रवर्गात असते का? फडणवीस साहेब हे तुमचं कर्तृत्व आहे. पण आमचा खेळ कसा आहे, मराठवाड्यातली पोरगी विदर्भात गेली की ती ओबीसी आणि इकडे ओपन. पोरं ओपन आणि आई ओबीसी. म्हणजे आहे का काही ताळमेळ. फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण न देणं हेच का तुमचं कर्तृत्व आहे का दादा, होऊ द्या दादा दूध का दूध पाणी होऊ द्या' असं आव्हानच जरांगेंनी केलं.
advertisement
'चपला भरलेले, बुट चाटणारे एक दोन चार आमदार आणले हेच काय तुमचं कर्तृत्व आहे. कारण ते तुमच्यासोबत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आमच्या आया बहिणीचे डोके फोडले होते, त्याला दोन वर्ष होतील. तुम्ही अंतरवालीमध्ये आमच्या आई बहिणीवर गोळ्या घातल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार म्हणून बोलणारे, मतदान झाल्यावर दिलं नाही हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमच्या गळ्यात टाळं टाकली तर कोणत्या ओवीवर वाजवायचे हे कळत नाही, नुसतं टणाटणा वाजवताय. शेतकऱ्यांचं काय केलं. तुम्ही लाडक्या बहिणीचं पगार बंद केले. तुम्ही दलित आणि मुस्लिमांमध्ये वाद लावला हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जर आमच्या आया बहिणीला मारलं नसतं तर आम्ही बोललो नसतो. तेवढा सभ्य पणा आहे आमच्यात आहे. तुम्ही अंतरवालीमधील पोरं, आया बहिणींवर हाफ मर्डरच्या केसेस दाखल केल्यात, हे कर्तृत्व कुणाचं आहे. ओरिजन पोटी जन्मलेला माणूस असं करत नाही. तुम्ही लावा बॅनर किती लावायचे. आमच्याकडे यादीच आहे, ती आम्ही व्हायरल करायला लागू, असा इशाराही जरांगेंनी दिला.