दोन भाऊ एकत्र येणं हा आमच्यासाठी कौटुंबिक आणि भावनिक मुद्दा असू शकतो, पण आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता केवळ दोन भाऊ नाही, तर राज्यातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे," अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि मराठी अस्मितेवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी एकजूट दाखवा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
advertisement
वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडला जाईल!
उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या एकजुटीवर भर देताना स्पष्ट केलं की, "आपल्यात राजकीय मतभेद असू शकतात, पक्ष वेगळे असू शकतात, पण सरतेशेवटी आपण सर्व मराठी आहोत. जर आपण एकमेकांमध्येच भांडत बसलो आणि वेगळ्या चुली मांडल्या, तर ज्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे, त्यांचे फावेल. ते आपली पोळी भाजून घेतील आणि महाराष्ट्र दुबळा होईल."
शिवसेना फोडण्यामागचा हेतू काय?
राजकारणात पक्षांतरं होणं नवीन नाही, मात्र शिवसेना ज्या क्रूर पद्धतीने फोडण्यात आली, त्यावर ठाकरेंनी कडाडून टीका केली. "राजकारणात लोक इकडून तिकडे जातात, आघाड्या होतात, युत्या तुटतात. पण एखादा पक्ष संपवणं, त्याचं नाव आणि चिन्ह चोरणं, त्याचं अस्तित्वच मिटवून टाकणं हा कोणता प्रयोग आहे? हे केवळ राजकारण नाही, तर मराठी माणसाची ताकद तोडण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र दुबळा करण्याचा डाव
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "शिवसेना ही मराठी माणसाची ढाल आहे. ही ढाल कमकुवत केली की महाराष्ट्र आपोआप दुबळा होईल, हे दिल्लीतील नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना संपवण्याचा घाट घातला. पण आता वेळ आली आहे की, आपण आपसातील मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र उभं राहिलं पाहिजे."
चर्चेला उधाण!
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर "दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा महाराष्ट्र वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे," या त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एक वेगळीच दिशा दिली आहे.
