नवी दिल्लीत महाराष्ट्र-गुजरात दिनाच्या निमित्याने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा नरेंद्र मोदींचा नवा भारत आहे, हे मोदींचं सरकार आहे, दहशतवाद्यांना चुन-चुनकर प्रत्युत्तर दिलं जाईल, कोणालाही माफ केलं जाणार नाही.
आपल्या नागरिकांच्या जीवावर दहशतवादी लढाई जिंकतील, असं कुणीही समजू नये
advertisement
अमित शाह यांनी पुढे म्हटले की, १९९० च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू आहे, पण आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झिरो टॉलरन्सची भूमिका घेण्यात आली आहे. आपल्या नागरिकांच्या जीवावर दहशतवादी ही लढाई जिंकतील, असं कुणीही समजू नये, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
चुन चुन के मारेंगे, कुणालाही सोडणार नाही
आमच्या संकल्पाची तुम्हाला सर्वांना पुन्हा आठवण करून देतो की दशतवाद्यांविरोधातील आमची लढाई सुरूच आहे. नक्षलवाद असो वा काश्मीरमधील दहशतवाद असो, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही त्यांचा खात्मा करू, कुणालाही सोडणार नाही, असे अमित शाह म्हणाले.
भारत भूमीतून दहशतवादाचा नायनाट केला जाईल
भारत भूमीतून दहशतवादाचा नायनाट केला जाईल. जगातील सर्व देश दहशतवादाविरुद्ध भारतासोबत एकत्र आले आहेत आणि उभे राहिले आहेत. जोपर्यंत दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील, असे अमित शाह म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर निर्णय घेत आहे. सरकारने बुधवारी पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, २३ एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.