नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत चिदंबरम यांनी 17 वर्षानंतर धक्कादायक कबुली दिली आहे. पी. चिदंबरम यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, पी. चिदंबरम यांनी मुंबई हल्ल्याबाबत म्हटले की, तत्कालीन यूपीए सरकारवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेमुळे पाकिस्तानविरुद्ध कोणतीही सूडाची कारवाई करण्यात आली नाही. चिदंबरम म्हणाले की त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार केला होता, परंतु सरकारने त्याला नकार दिला.
पी. चिदंबरम यांनी आपल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, "ज्या दिवशी दहशतवादी मारले गेले त्या दिवशी मी गृहमंत्री झालो. 30 नोव्हेंबर रोजी शेवटचा दहशतवादी मारला गेला. मला वाटते की तो रविवार होता जेव्हा पंतप्रधानांनी मला फोन केला होता. मला सांगण्यात आले की मला अर्थ खात्यातून गृहमंत्रालयात बदली केली जात आहे, परंतु मी त्यासाठी तयार नव्हतो, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.
पाकिस्तानविरुद्ध कारवाई का केली गेली नाही?
चिदंबरम म्हणाले, "मला सुरक्षा दलांच्या तयारीची माहिती नव्हती. मला आपल्या गुप्तचर संस्थांच्या तयारीची काहीच माहिती नव्हती. मला पाकिस्तान आणि शेजारच्या गुप्तचर संस्थांनी उभारलेल्या साधनसंपत्तीची काहीच माहिती नव्हती. परंतु त्याक्षणी, मला वाटले की आपण या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे. मी पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या लोकांशी या विषयावर चर्चा केली, परंतु परराष्ट्र खातं आणि आयएफएसचा मुख्यत्वे निष्कर्ष असा होता की आपण परिस्थितीवर थेट प्रतिक्रिया देऊ नये, तर त्याऐवजी राजनैतिक मार्ग अवलंबून पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला हवे.
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी घेतली होती पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट
पी. चिदंबरम यांनी म्हटले की, "मी पदभार स्वीकारल्यानंतर दोन-तीन दिवसांनी तत्कालीन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी माझी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या या कृत्यावर प्रतिक्रिया देऊ नका असे सांगितले."
भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले
चिदंबरम यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "माजी गृहमंत्र्यांनी 17 वर्षांनंतर जे कबूल केले आहे ते देशाला आधीच माहित होते. 26/11 चे हल्ले परकीय शक्तींच्या दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले. आता खूप उशीर झाला असल्याचे त्यांनी म्हटले.