देशातील दिल्ली आणि बडोदा या ठिकाणी हायड्रोजन इंधनावर बस धावत आहेत. आता पुण्यातही हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसची चाचणी घेण्यात आली. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल यांच्या समन्वयाने बुधवारी पुण्यात ही चाचणी आयोजित करण्यात आली.
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
advertisement
कसे बनते हायड्रोजन इंधन?
हायड्रोजन इंधन नैसर्गिक वायू, पाणी किंवा बायोमासपासून तयार केले जाते. त्यात मिथेन आणि पाण्याची वाफ यांची विशिष्ट तापमानानुसार प्रक्रिया करून, विजेच्या सहाय्याने पाण्यातून हायड्रोजन इंधन निर्माण केले जाते. हायड्रोजन (H₂) वेगळा करून विभक्तीकरण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने लिथियमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि हा पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत मानला जातो. चाचणीच्या निकालानुसार व्यवस्थापन ठरविले जाईल आणि त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे महाऊर्जा प्रकल्प विभागाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग यांनी सांगितले.
या बसचे वैशिष्ट्य काय?
या बसचे वैशिष्ट्य असे आहे की, यात 35 आसने आहेत आणि दहा जण उभे राहू शकतात. बसची कमाल गती 70 किलोमीटर प्रति तास असून, एका किलो इंधनावर सुमारे 11 किलोमीटर प्रवास केला जाऊ शकतो. चाचणी यशस्वी ठरल्यास, लवकरच पीएमपी सेवेत हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसचा वापर सुरू होईल, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि शाश्वत वाहतूक सुविधेला चालना मिळेल.
पीएमपीच्या ताफ्यात पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार महाऊर्जा आणि टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून या बसच्या वापरासाठी पुढाकार घेतला जात आहे. चाचणीच्या निकालानुसार लवकरच हायड्रोजन इंधनावर आधारित बस पीएमपी सेवेत दाखल करण्यात येतील, असे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले.