नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी खुर्द येथील स्थानिक सलून व्यावसायिक राजेंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा क्षीरसागर हे नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले होते. खंडोबा मंदिर परिसरातील बैलगाडा शर्यत घाटाजवळून वारसुळा वस्ती मार्गे ते पायी जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून अचानक आग्या मोहळाच्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.
advertisement
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्षीरसागर दाम्पत्य भांबावून गेले. मधमाशांनी शरीरावर अनेक ठिकाणी दंश केल्याने दोघेही वेदनेने विव्हळत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने अवसरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर त्वरित वैद्यकीय उपचार करण्यात आले. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बैलगाडा घाटाजवळ नागरिक आणि खेळाडूंची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी आग्या मोहळ असल्याने इतर नागरिकांनीही या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला
नुकतंच आणखी एक घटना पुणे जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मढेघाट परिसरातून समोर आली होती. इथे रविवारी संध्याकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या ५० विद्यार्थ्यांच्या पथकावर मधमाशांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ३५ हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक जखमी झाले. मात्र, दुर्गम भागात स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.
