पुणे शहर सध्या गणेशोत्सवामुळे भक्तीमय झालं आहे. विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणरायाच्या आरतीची लगबग मंडळात सुरू होती. पण अचानक नाना पेठ परिसरात गोळीबाराचा आवाज आला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्या. ३ गोळ्या आयुषला लागल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आयुष गणेश कोमकर हा क्लास वरून तो घरी येत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसमानी हल्ला केल्याची शक्यता आहे. आयुष हा वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. मयत आयुष हा वनराज आंदेकर याचा भाचा होता. आयुष हा क्लास वरून घरी येताना त्याच्या घराखाली बेसमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या ६ टिम्स तैनात करण्यात आल्या आहेत. वनराज आंदेकर याची झालेली हत्या आणि आत्ताच्या घटनेचा काही संबंध आहे का या दृष्टीने ही तपास सुरू आहे. या घटनेत ज्याचा सहभाग असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला सोडला जाणार नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
advertisement
सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा रक्तरंजित वाद
पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला होता. वनराज आंदेकर यांचं त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसलं होतं. या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी, कल्याणी या दोन सख्ख्या बहिणी आणि जयंत आणि गणेश या त्यांच्या नवऱ्यांसह सोमनाथ गायकवाड , या प्रमुख आरोपींसह 23 जणांना अटक केली होती.
४ दिवसांपूर्वी केला होता प्रयत्न
पण, ४ दिवसांपूर्वी म्हणजे, १ सप्टेंबर रोजी आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने एक प्लॅन रचला होता. पण या पोलिसांनी याची कुणकुण लागली. पोलिसांनीही सगळ्यांवर नजर ठेवली आणि आंदेकर टोळीचा डाव हाणून पाडला. त्याचं घडलं असं की, कृष्णा आंदेकरने रुमसाठी 5000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेनं वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराचे रेकी केली अन् घरं पाहिली. त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असं काळेला कळवलं. मात्र, अमन आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.
कृष्णा फोनच उचलत नसल्याचं पाहिल्यावर काळे याने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असं कळवलं होतं. पाटीलने कॉल केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता काळेला कॉल केला गेला. त्यावेळी सात ते आठ जणांना पाच हत्यारं घेऊन पाठवलं आहे, असं सांगितलं होतं. तर अमनने कॉल करून 'लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा' असं कळवलं होतं.
त्या दिवशी गेम चुकला अन् आज सापडला
मात्र, पोलिसांना या प्लॅनची टीप मिळाली होती. पोलिसांनी नजर ठेवली एकाला रंगेहात पडकलं. त्यामुळे हा डाव फसला होता. पण आंदेकर टोळी कुणाला मारणार होते, हे तेव्हा कळलं नाही. पण, ५ सप्टेंबर रोजी अखेर आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली.