एम.आय.टी. कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा अर्थ पिंपरे हा विद्यार्थी बुधवारी संध्याकाळी एम.आय.टी. कॉर्नरवरून वाघोलीकडे जात होता. प्रवास संपल्यानंतर तो घाईत रिक्षेतून उतरला, मात्र त्याची लॅपटॉप असलेली बॅग रिक्षेतच राहिली. काही वेळाने लक्षात येताच अर्थ परत आला, पण रिक्षेचा क्रमांक लक्षात नसल्यामुळे तो असहाय झाला. तात्काळ त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली.
advertisement
दरम्यान, विद्यार्थ्याच्या नशिबात एक आनंदाची बातमी होती. रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी स्वतःहून अर्थशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, अर्थने गुगल पे द्वारे रिक्षाचं भाडं दिलं होतं. त्या ट्रान्झॅक्शन आयडीवरून त्यांनी विद्यार्थ्याचं नाव शोधलं आणि मित्राच्या मदतीने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट शोधून त्याला मेसेज पाठवला. अर्थने मेसेज पाहताच आनंदाने धावत जाऊन आपली बॅग परत घेतली. लॅपटॉप आणि इतर वस्तू पूर्णपणे सुरक्षित अवस्थेत होत्या.
या प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी कृतीसाठी लोणी काळभोर पोलिसांनी मोहन चंदनशिवे यांचा विशेष सन्मान केला. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मोहन चंदनशिवे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा दृष्टिकोन समाजासाठी एक आदर्श आहे, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितलं.
अनेकदा चोरी, फसवणूक आणि बेइमानीच्या घटनांनी समाजातील विश्वास डळमळीत होतो. मात्र, मोहन चंदनशिवे यांनी दाखवलेलं प्रामाणिकपण आणि जबाबदारीची भावना समाजात अजूनही चांगुलपणाचं बीज जिवंत असल्याचं सिद्ध करतं.