ठाणे : अंबरनाथ, ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक नगर, अनेक ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर. अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजे आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर हे पांडवकालीन असल्याचे मानले जाते. मुंबईपासून अवघ्या 65 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिवमंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया या प्राचीन मंदिराची गोष्ट...
advertisement
राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी इसवी सन 1060 या कालखंडात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 65 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तिथून खाजगी रिक्षा केली की सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज जाता येते.
Mahashivratri 2025: महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त चुकवू नका!
मंदिराच्या बाहेरच्या भागात असलेली शिल्पकामे आणि नक्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांची मांडणी करतात. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती प्रवेशद्वारावर आहे. अंबरनाथ शिवमंदिरात अनेक पायऱ्या, अनेक देवतांची शिल्पे, कोरीवकाम आणि रचना आहेत. यात एक मुख्य खोली आहे, ज्याला गाभारा म्हणतात, जिथे शिवलिंग ठेवलेले आहे. शिवमंदिर जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवले गेले होते.
उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने 1022 ते 35 या काळात हे देऊळ उभारण्यास प्रारंभ केला. माम्वाणी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ शिवमंदिर या प्राचीन मंदिराचा समावेश आहे.
स्थानिकांच्या मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीत एका मोठ्या दगडातून हे मंदिर काळ्या बेसाल्टचा वापर करून बांधण्यात आले आहे. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. विशेषतः महाशिवरात्रीत येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांचे आगमन होतं आणि त्यावेळी मंदिराच्या परिसरात भक्तिरसाची लहर वेगळीच असते.
या मंदिराचं धार्मिक महत्त्व केवळ स्थानिक धार्मिक समुदायासाठीच नाही तर पर्यटकांसाठी देखील आहे. मंदिराभोवती असलेल्या हरित क्षेत्रांनी देखील या ठिकाणी एक शांत आणि सकारात्मक वातावरण तयार केले आहे.
अंबरनाथमधील शिवमंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, तर ते इतिहास, संस्कृती, आणि भारतीय वास्तुकलेचं आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही या मंदिराला भेट दिली नसेल तर येत्या महाशिवरात्रीला आवर्जून या ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायला विसरू नका.