कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसतं असं नेहमी म्हटलं जातं. कारण कोल्हापूरकर जे काय करतात ते अगदी मनापासून. भारताने तब्बल 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् कोल्हापूरकर नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटले. हातात तिरंगा, ढोल, ताशा अन् हलगीचा निनाद, ‘भारत माता की जय’चा जयघोष आणि फटक्यांची आतषबाजी असं जल्लोषाचं वातावरण रात्री उशिरापर्यंत होतं. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कोल्हापूरकर सहभागी झाले होते.
advertisement
कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसतं !
भारताच्या खेळाडूंना विशेष अभिनंदन करत, त्यांच्या कष्टांची आणि मेहनतीवर कोल्हापूरकरांकडून स्तुतीसुमन उधळली जात होती. अगदी कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसतं अशा प्रकारच वातावरण इथे निर्माण झाला होता. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र झालेले लोक आपल्या आवडत्या क्रिकेटरचे फोटो उंचावत आणि ‘जय हिंद’च्या घोषणांसह उत्सव साजरा करत होते.
होळीआधीच दिवाळी! Team India ने 12 वर्षांनी जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, पुण्यात नुसता जल्लोष!
विषय हार्ड सेलिब्रेशन
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये नेहमीच भारताने एखादा सामना जिंकला की सगळे लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करतात. यात तरुणांसह मोठ्या प्रमाणात युवतींचा देखील सहभाग असतो. खास लोकल 18 ने या जल्लोष करणाऱ्या युवतींची प्रतिक्रिया जाणून घेतली. “विषय हार्ड सेलिब्रेशन असतं. आम्ही याठिकाणी पहिल्यांदाच आलो आहोत. इथे जल्लोषात सहभागी झालेले तरुण फटाके, गाड्या, आतषबाजी, झेंडे, पोस्टर्स घेऊन सहभागी झाले होते.” इथलं वातावरण बघून वातावरण पेटलंय अशी प्रतिक्रिया एका तरुणीने दिली. त्याचबरोबर काही जण आपल्या कुटुंबासोबत आले होते. त्यांनीही मोठ्या उत्साहाने या जल्लोषात सहभाग घेतला होता.
ना कोणतं राज्य ना कोणता प्रांत.. फक्त इंडिया !
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही महिला या फक्त जल्लोष बघण्यासाठी बाहेर गावाहून आल्या होत्या. त्यांनी भारत सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष कोल्हापुरात कसा असतो हे बघण्यासाठी आणि जल्लोषात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांनी कोल्हापुरातच राहून देखील हा जल्लोष प्रत्यक्षात अनुभवला नव्हता. मात्र आता हा जल्लोष अनुभवल्यानंतर “ना कोणता राज्य ना कोणता प्रांत फक्त आणि फक्त इंडिया” असे उद्गार त्यांनी लोकल 18 शी बोलताना काढले.
दरम्यान, कोल्हापूरकर आणि खेळ यांचं खास नातं आहे. त्यामुळेच कोल्हापुरात कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट कोणताही सामना असो, कोल्हापूरकरांना त्याचं भारी कौतुक असतं. एखाद्या सामन्यात भारतानं बाजी मारली तर कोल्हापुरात नादखुळा सेलिब्रेशन होतं. त्याची सर्वत्र चर्चा असते. नुकतेच भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला तेव्हाही कोल्हापुरात मोठा जल्लोष झाला होता.





