रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेटच खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहित शर्माची वनडे कॅप्टन्सीही काढून घेण्यात आली आहे. विराट आणि रोहितने भारताकडून शेवटची मॅच मार्च महिन्यात खेळली होती. यानंतर दोघंही आयपीएलमध्ये खेळले, पण जून महिन्यानंतर दोघांनीही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही. आता 19 ऑक्टोबरपासून रोहित आणि विराट ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये पुन्हा दिसतील.
advertisement
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडे क्रिकेटमधल्या भवितव्याबाबत कर्णधार शुभमन गिलला विचारण्यात आलं आहे. विराट आणि रोहित हे आमच्या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या योजनांचा भाग असल्याचं शुभमन गिलने स्पष्ट केलं आहे.
विराट-रोहितसारखे कमी खेळाडू
'या दोघांचा अनुभव आणि त्यांनी भारताला जिंकवलेले सामने, असे विक्रम करणारे खूप कमी खेळाडू आहेत. जगात असं कौशल्य, गुणवत्ता आणि अनुभव असणारे खूप कमी खेळाडू आहेत, त्यामुळे आम्ही निश्चितच त्यांच्याकडे भविष्यातील योजनांचा भाग म्हणून पाहत आहोत', असं गिलने भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
'वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती, पण मला वनडे टीमची कॅप्टन्सी सोपवण्याबद्दल थोडं आधी समजलं होतं. भारताचं नेतृत्व करणं हा सन्मान आहे', असं गिल म्हणाला आहे.
'मला माझ्या देशाचं नेतृत्व करण्यात खूप आनंद होत आहे. गेले काही महिने खूपच रोमांचक राहिले आहेत. पण भविष्यात काय होईल, याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. मला शक्य तितके वर्तमानात राहायचे आहे. आम्ही मागे काय केलं, हे मला मागे वळून पाहायचं नाहीये, फक्त पुढे पाहायचं आहे, येणाऱ्या महिन्यांमध्ये समोर जे आहे ते आम्हाला जिंकायचं आहे', अशी प्रतिक्रिया शुभमन गिलने दिली आहे.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबतच्या संबंधांवरही गिलने भाष्य केलं आहे. 'आमचे संबंध चांगले आहेत. खेळाडूंना सुरक्षित कसं बनवायचं, याबद्दल आम्ही चर्चा करतो. फास्ट बॉलर्सचा एक ग्रुप तयार करण्याबद्दल आम्ही बोलतो', असं गिलने सांगितलं.