आता ही भिती का तयार होते? हायड्रोफोबिया म्हणजे काय हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊ. पण त्यापूर्वी रेबिज म्हणजे काय हे आधी सविस्तर समजून घेऊ.
रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने कुत्रा, मांजर, लांडगा, घोडा यासारख्या सस्तन प्राण्यांच्या लाळेमार्फत पसरतो. जर या प्राण्यांनी कोणाला चावलं, तर त्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. प्रारंभी साधे फ्लू सारखे लक्षणं दिसतात. ताप, अंग दुखणं, थकवा दिसतो, पण ही केवळ सुरुवात असते.
advertisement
हायड्रोफोबिया म्हणजे काय?
रेबीजच्या शेवटच्या टप्प्यात, जेव्हा विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो, तेव्हा एक अत्यंत विचित्र आणि घातक लक्षण दिसतं. हायड्रोफोबिया. यात व्यक्तीला पाण्याची भीती वाटू लागते. हे वाचून आश्चर्य वाटेल, पण हा लक्षण इतकं गंभीर असतं की केवळ "पाणी" हा शब्द जरी ऐकला तरी पेशंट घाबरतो.
पाणी प्यायला का घाबरतो माणूस?
रेबीजचा विषाणू मेंदूतील नर्व्ह सिस्टीमवर आघात करतो. त्यामुळे गिळण्याच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. पाणी पिण्याचा प्रयत्न केला, की गळ्यात अचानक आकुंचन (स्पॅझम) निर्माण होतो जणू काही गळ्यात काहीतर अडकतोय असं वाटतं. यामुळे कितीही तहान लागली तरी माणूस पाणी प्यायचं टाळतो. त्यातूनच ही मानसिक भीती तयार होते ज्याला हायड्रोफोबिया म्हणतात.
याची इतर लक्षणं कोणती?
गिळताना गळ्यात अडथळा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास, सतत भीती, झोप न लागणे, लाळ सतत गळणे, चावलेल्या जागेवर चुरचुर किंवा खाज.
हे टाळता येऊ शकतं का?
हायड्रोफोबिया झाल्यानंतर हे थांबवता येत नाही, पण ते येऊच नये यासाठी वेळीच उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. प्राण्याने चावल्यावर एक क्षणही न घालवता डॉक्टरांकडे जावं आणि आवश्यक रेबीजची लस टोचून घ्यावी. यामुळे विषाणू मेंदूपर्यंत पोहोचण्याआधीच थांबवता येतो.
शेवटी काय लक्षात ठेवायला हवं?
कुत्रा, मांजर, घोडा अशा कोणत्याही प्राण्याने चावल्यावर ते गंभीर न मानणं, "जखम छोटी आहे" असं गृहीत धरून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कारण ही लक्षणं एकदा का तीव्र झाली की थांबवणं जवळपास अशक्य असतं. वेळेवर उपचार घेतले, तर रेबीज टाळता येतो आणि आयुष्य वाचवता येतं.