'लोक कलाकारांवर का पैसे खर्च करतील?', दिग्गज दिग्दर्शकाचं भयानक भाकित, समोर आणलं इंडस्ट्रीचं सत्य
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Entertainment Industry : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शकाच्या मते, पुढील दीड वर्षांत सिनेमा इंडस्ट्री पूर्णपणे बंद होऊ शकते.
मुंबई : सध्या मनोरंजन विश्वापासून ते थेट दैनंदिन जीवनापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वाढत चालला आहे. या एआयच्या वाढत्या वर्चस्वामुळे आता बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक तथा निर्माते महेश मांजरेकर यांनी एक धक्कादायक आणि भीतीदायक भाकीत केले आहे. त्यांच्या मते, पुढील दीड वर्षांत सिनेमा इंडस्ट्री पूर्णपणे बंद होऊ शकते.
एका मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर यांनी एआयच्या क्षमतेवर भाष्य करत हे भाकीत केले. त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, एआयमुळे येणाऱ्या काळात चित्रपट बनवण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. महेश मांजरेकर म्हणाले, "माझे स्पष्ट मत आहे की, दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल, बंद म्हणजे बंदच! एआयने आता इतका टेकओव्हर केला आहे की, ते जे व्हिज्युअल्स तयार करतात, ते कॅमेऱ्यावर करणं शक्यच नाही."
advertisement
ते पुढे म्हणाले, "तुम्ही कितीही चांगले व्हीएफएक्स केले, तरी तुम्ही ती व्हिज्युअल्स कॅमेऱ्यावर देऊ शकत नाही. मी घरी बसून 'टायटॅनिक'सारख्या चित्रपटातली लाइटिंग, लिओनार्डो डिकॅप्रिओपेक्षा चार पटींनी सुंदर हिरो... यासह सिनेमा बनवला, तर मी तो सहज बनवू शकतो."
advertisement
महाभारताचा ट्रेलर आणि कोडची भीती
एआयच्या प्रगतीवर बोलताना मांजरेकर यांनी महाभारताच्या एका एआय-निर्मित ट्रेलरचे उदाहरण दिले. "मी 'महाभारत'चा ट्रेलर पाहिला, तो अक्षरशः डोळे दीपवणारा ट्रेलर आहे. जर हे सगळे एका क्लिकवर होणार असेल, तर लोक कलाकारांवर का पैसे खर्च करतील?" असा सवाल त्यांनी केला.
advertisement
मांजरेकर यांना भीती आहे ती एका 'कोड'ची. ते म्हणाले, "ज्या दिवशी एआय हाती सिनेमा बनवण्याचा कोड लागेल, त्या दिवशी आपण संपणार. रोज १० हजार सिनेमे बनतील आणि याला काही खर्चही येत नाही. सहा महिन्यांपूर्वी मी पाहिलेल्या एआयमध्ये आणि आताच्या एआयमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे."
२ हजार रुपयांत जाहिरात चित्रपट!
मांजरेकर यांनी त्यांच्या एका मित्राचा अनुभव सांगताना सांगितले की, "माझ्या एका मित्राने एआयच्या मदतीने जाहिरात फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये... त्यामुळे येत्या दीड वर्षांत सिनेमे बंद होणार, हे खूपच धोकादायक आहे. हे माझं भाकीत आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी गुपचूप नाटकांकडे वळलं पाहिजे."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'लोक कलाकारांवर का पैसे खर्च करतील?', दिग्गज दिग्दर्शकाचं भयानक भाकित, समोर आणलं इंडस्ट्रीचं सत्य


