30 वर्षांपूर्वी उपकार, अजितदादांची बातमी कळताच संन्यास घेतलेला जुना सहकारी परतला, आठवणीत पाणवले डोळे, पाहा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या गर्दीत अंगावर भगवे वस्त्र घातलेल्या एका व्यक्तीने अनेकांचं लक्ष वेधलं. ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा तो दुसरा तिसरा कुणी नव्हे तर अजित पवारांचा जुना सहकारी निघाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ बारामतीचा विकास केला नाही, तर त्यांनी बारामतीतील प्रत्येक माणूस, सहकारी, कार्यकर्ता जपण्याचा प्रयत्न केला. बुधवारी विमान अपघातात अजित पवारांचं निधन झाल्यानंतर आता अनेकजण अजितदादांच्या जुन्या आठवणी सांगत आहेत. आज बारामतीत शोकाकुल वातावरण आहे. अनेकजण चिंतातूर अवस्थेत आहेत. कुणाला अन्नही गिळवत नाहीये, अशी स्थिती आहे. लोकांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजवर अलोट गर्दी केली आहे.
या गर्दीत अंगावर भगवे वस्त्र घातलेल्या एका व्यक्तीने अनेकांचं लक्ष वेधलं. ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा तो दुसरा तिसरा कुणी नव्हे तर अजित पवारांचा जुना सहकारी निघाला. काही वर्षे आधी त्यांनी संन्यास घेतला होता. राजकारणापासून दूर गेले होते. पण अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच ते पुन्हा बारामतीत आले. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्यावर अजित पवारांनी कसे उपकार केले होते, याची माहिती दिली. तसेच अजित पवार आपल्यातून गेलेत, यावर विश्वासच बसत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
advertisement
याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, "मी किल्ले धारूरवरून आलो आहे. काल नाशिकला चाललो होतो. पण ही बातमी कळल्यानंतर इकडं यावं लागलं. अजितदादांचे आमच्यावर पहिले उपकार आहेत, त्यामुळे यावंच लागलं.१९९६ साली आमची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तेव्हा कल्याणी स्टीलमध्ये त्यांनी आम्हाला काम दिलं होतं. तसेच डायनामिक्स डेअरीचं देखील काम आम्हाला मिळालं होतं. आम्ही समोरासमोर बसून एकमेकांशी बोललो आहे."
advertisement
"मी पाच सहा वर्षांपूर्वी संन्यास घेतलाय. त्यामुळे मी राजकारणात फारसा नसतो. आधी मी अजित दादांच्या मिटींगला-सभेला अनेक ठिकाणी असायचो. दादा आपल्यात नाहीत, असं वाटतंच नाही. अजित पवार कुठून तरी हाक मारतील, असं वाटतं. संन्यास घेतला असला तरी दादांना विसरणं शक्यच होणार नाही" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
advertisement
नेमका अपघात कसा झाला?
ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं.
advertisement
दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसा, हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजुला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.
ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
advertisement
अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता. DGCA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील विमान तळ Table Top Runway प्रकारचं आहे. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडींग होईल असं वाटलं होतं. मात्र जमीनीपासून १०० फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहचण्याआधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि चार ते पाच स्फोट घडले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेनं धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 8:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
30 वर्षांपूर्वी उपकार, अजितदादांची बातमी कळताच संन्यास घेतलेला जुना सहकारी परतला, आठवणीत पाणवले डोळे, पाहा VIDEO









