अजित पवारांचे प्रताप, सरकारला कारनाम्यांनी सरकारची कोंडी; कधी थांबणार 'वाद' कथा?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राजकारणातल्या हर मर्ज की दवा बनलेलं अजित पवार आता मात्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याचं पाहायला मिळतं आहे.
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंमुळे सरकारची कोंडी झाल आहे. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे सरकारची अडचण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळंच अजित पवार सरकारसाठी अवघड जागेचं दुखणं बनल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आपल्या राजकीय खेळींनी अजित पवारांनी भल्या- भल्यांना घाम फोडला आहे. सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं असो की महाविकास आघाडीचं किंवा मग आताचं महायुतीचं.. अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद ठरलेलं आहे. अजित पवार आणि सत्ता हे जणून समीकरणच बनलं आहे. अजित पवार म्हणजे सत्तेची गुरूकिल्ली, राजकारणातल्या हर मर्ज की दवा बनलेलं अजित पवार आता मात्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचं कारण अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांचे कारनामे ठरले आहे.
advertisement
अजित पवारांच्या नेत्यांचे कारनामे
- संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडच्या अटकेनं राष्ट्रवादीचे तत्कालिन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
- पहिल्या खातेवाटपात कृषिमंत्री बनलेल्या माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांनी आणि नंतरच्या रमी प्रकरणानं सरकारची डोकेदुखी वाढवली आणि कोकाटेंचं खातेबदल करुन वाद शांत करावा लागला.
- वादग्रस्त विधानामुळे कृषिमंत्रीपद गमावल्यानंतर कोकाटेंचा प्रताप काही थांबले नाही, आता तर सदनिका गैरव्यवहारप्रकरणी प्रकरण कोकाटेंनी सरकारला अडचणीत आणलंय.
- अजित पवारांनी ज्यांना कृषिमंत्री केलं, त्या भरणेंनीही त्यांच्या वाकड्या विधानांनी पहिल्याच दिवशी वाद निर्माण केला. त्यामुळं पुन्हा एकदा विरोधकांना टीकेची संधी मिळाली.
- सरकारला टीकेचे धणी बनवणारे अजित पवारांचे एवढेच मंत्री नाहीत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अर्थात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनीही कर्जमाफीला नाद म्हणत, शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं आणि सरकारची अडचण वाढवली होती.
- अजित पवारांच्या आमदारांनीही सरकारची कमी डोकेदुखी वाढवली नाही पुण्यातील पोर्शे कार अपघातात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या हस्तक्षेपानं मोठं राजकारण तापलं होतं. हा वाद निस्तरायला वर्ष सहा महिन्यांचा काळ लागला. तोवर विरोधकांची सरकारवरची टीका, आरोप सुरूच राहिले.
advertisement
अजित पवारांच्या सहकाऱ्यांचे कारनामे देखील आले. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारानंही सरकार चांगलंच अडचणीत आणल्याचं पाहायला मिळालं. सरकारी जमिनीवर डल्ला मारत, महसूल विभागाचे मुद्रांक शुल्काची सूट मिळवण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं नियमांची, कायद्याची पायमल्ली केल्याचं समोर आलं. ज्यामुळं सरकारची चांगलीच कोंडी झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज
केवळ आमदार, मंत्री, मुलापर्यंत राहिलं का? तर नाही. स्वत: अजित पवारांच्या कृतीनंही सरकारची नामुष्की झाल्याचं दिसलं. सोलापूरच्या कुर्डू गावात अवैध उत्खनन रोखणाऱ्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी अजित पवारांनी फोनवरुन थेट धमकी दिल्यान सरकारवर टीकेची झोड उठली. अजित पवारांच्या या धमकीनं सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं ज्यामुळं स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नाराज व्यक्त करत अजित पवारांना समज दिल्याचं समोर आलेलं.
advertisement
अजित पवार आणि त्यांचा पक्ष सरकारसाठी अवघड जागेचं दुखणं
महायुती सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कारभारात जितके वाद निर्माण झाले, त्यात सर्वाधिक प्रकरणं हे अजित पवारांच्या राष्टवादीशी संबंधित आहेत. आता पुन्हा एकदा क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतापानं सरकारच्या डोक्याचा ताप वाढवला आहे. थेट सत्रन्यायालयानंच कोकाटेंविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.. ही सगळी प्रकरणं बघता, अजित पवार आणि त्यांचा पक्ष सरकारसाठी अवघड जागेचं दुखणं बनल्याची चर्चा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 9:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांचे प्रताप, सरकारला कारनाम्यांनी सरकारची कोंडी; कधी थांबणार 'वाद' कथा?










