आता तो कधीच म्हणणार नाही, मामाच्या गावाला जाऊया! संक्रांतीच्या आनंदावर विरजण; पतंगाने कापली १४ वर्षीय अर्णवच्या आयुष्याची दोर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोपरगावच्या लक्ष्मीनगरमध्ये १४ वर्षीय अर्णव महेश व्यवहारेचा पतंग उडवताना विद्युत शॉकने मृत्यू झाला. ऋषिकेश वाघमारे गंभीर जखमी. परिसरात शोककळा.
सुट्टी असली की मामाचं गाव आठवतं, मामाच्या गावात मज्जा, खेळणं आणि बागडणं यात दिवस संपून जातो. असाच 14 वर्षांचा अर्णवही संक्रांती निमित्ताने मामाच्या गावाला आला होता. संक्रांतीला पतंग उडवायचं ठरलं. पण मांजा किंवा दोरी नव्हती. म्हणून मग त्यांनी जवळ असलेल्या वायरीच्या मदतीनं पतंग उडवून खेळ सुरू केला.
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात १४ वर्षीय मुलासाठी हाच पतंग काळ बनून आला. एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. पतंग उडवण्यासाठी मांजाऐवजी वायडिंग तारेचा वापर करणं शाळकरी मुलाच्या जीवावर बेतलं. पतंग उडवताना या तारेचा स्पर्श जवळूनच गेलेल्या हायव्होल्टेज विद्युत वाहिनीला झाला आणि शॉक लागून १४ वर्षीय अर्णव महेश व्यवहारेचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
सण साजरा करण्यासाठी आला होता मामाकडे
मूळचा पिंपरी-चिंचवड इथला रहिवासी असलेला अर्णव काळेवाडी फाटा परिसरात राहायचा. मकरसंक्रांतीचा सण आपल्या मामाकडे साजरा करण्यासाठी तो मोठ्या आनंदाने कोपरगावला आला होता. बुधवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी अर्णव आणि त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे (वय १९) घराच्या टेरेसवर पतंग उडवत होते.
नेमकं काय घडलं?
अर्णव आणि त्याचे मित्र पतंग उडवण्यासाठी मांजाऐवजी पातळ लोखंडी वायडिंग तारेचा वापर करत होते. पतंग आकाशात झेपावला असताना अचानक वाऱ्याच्या वेगाने ही तार घराशेजारील उच्च दाबाच्या वीज वाहिनीला टेकली. लोखंडी तार असल्याने क्षणात विजेचा प्रवाह अर्णवच्या अंगात उतरला. या भीषण दुर्घटनेत अर्णवचा जागीच मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ऋषिकेश वाघमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
परिसरात शोककळा
मामाकडे सण साजरा करायला आलेल्या भाच्याचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी ऋषिकेशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 1:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता तो कधीच म्हणणार नाही, मामाच्या गावाला जाऊया! संक्रांतीच्या आनंदावर विरजण; पतंगाने कापली १४ वर्षीय अर्णवच्या आयुष्याची दोर









