...तर सरकारची खैर नाही, संयमी थोरातांचा आक्रमक पवित्रा, बच्चू कडू यांच्या पाठोपाठ काँग्रेसही आक्रमक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Congress on Loan Waiver: बच्चू कडू यांच्या पाठोपाठ शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेस पक्षानेही आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. आपल्या २० पेक्षा अधिक मागण्या सरकारने मान्य केल्या असून कर्जमाफीची तारीख २ ऑक्टोबरच्या आधी जाहीर करावी नाहीतर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
बच्चू कडू यांच्या पाठोपाठ शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेस पक्षानेही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दिलेले आश्वासन पाळणे हे नैतिक कर्तव्य असताना सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी कशाला करायची असा रोखठोक सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
थोरातांना सरकारवर वेगळीच शंका, शेतकऱ्यांची फसवणूक ठरू नये
बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
advertisement
...तर सरकारची खैर नाही
आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी समिती नाही, नियत लागते. या अगोदरही विविध आंदोलने दडपण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी केलेली आहे; पुढे त्याचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र, आता शेतकरी बांधव सरकारकडे लक्ष ठेऊन आहे, त्यांच्यासोबत धोका झाला, तर मात्र या सरकारची खैर नाही, असे थोरात म्हणाले.
advertisement
बच्चू कडू यांच्या आंदोलनाने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला
यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, फळबागा, कापूस, धान आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभरात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. दुसरीकडे बँकांकडून शेतीसाठी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. अशा वेळी, माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. आज हे आंदोलन तत्वता: पुढे ढकललेले आहे. पुढील काही दिवस त्यांनी तब्येत जपावी आणि उपचारही घ्यावेत.
advertisement
कर्जमाफीशिवाय आता पर्याय नाही
सरकारने फसवाफसवी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कर्जमाफीशिवाय आता पर्याय नाही, काँग्रेस पक्षाची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे समितीचे सोहळे करण्याऐवजी सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणे कठीण होईल, असा इशारा थोरात यांनी दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर सरकारची खैर नाही, संयमी थोरातांचा आक्रमक पवित्रा, बच्चू कडू यांच्या पाठोपाठ काँग्रेसही आक्रमक