आता आमची गरज राहिली नाही, मग जगायचं कसं? शेती अवजारे बनवणाऱ्यांवर का आली अशी वेळ?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture: ग्रामीण कृषी व्यवस्थेत शेतकऱ्यांसोबतच शेतीसाठी आवश्यक साधनं पुरवणारा मोठा वर्ग होता. परंतु, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शेती अवजारे बनवणाऱ्या या वर्गाचा रोजगार गेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याची चाहूल लागली आहे आणि खरीप हंगामाच्या तयारीला देखील वेग आला आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, यंदाच्या हंगामात एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी शेतीचा अविभाज्य भाग असलेली, लाकडी शेती अवजारे आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या जागी आधुनिक लोखंडी अवजारांनी आपले स्थान मजबूत केले आहे. हा बदल केवळ शेतीपुरता मर्यादित नसून, त्यावर अवलंबून असलेल्या एका मोठ्या पारंपरिक कारागीर समुदायाच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम करत असल्याचे लाकडी अवजारे निर्मितीकार अंबादास जाधव यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या लाकडी अवजारांना एक मोठा इतिहास आहे. लाकडी नांगर, कुदळ, पाभर, वखर, कोळपे ही अवजारे शेतीकामांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. ती केवळ मातीशी जोडलेली नव्हती, तर ती शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. पण काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने आणि उत्पादनक्षमतेच्या वाढीमुळे आता लोखंडी अवजारांनी त्यांची जागा घेतली आहे. लोखंडी अवजारे टिकाऊ, कमी देखभालीची आणि वेगवान असल्याने शेतकऱ्यांचा कल तिकडे वाढला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात, पिढ्यानपिढ्या लाकडी शेती अवजारे बनवणाऱ्या कारागिरांवर आज उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले आहे. ज्यांच्या हातांना लाकूडकामाची सवय होती, ज्यांच्या कलाकुसरीवर शेती अवलंबून होती, ते कारागीर आज बेरोजगार झाले आहेत. अनेक वर्षांची त्यांची कला आणि कौशल्य आता निरुपयोगी ठरत आहे. आम्ही लहानपणापासून हेच काम करत आलो आहोत, पण आता बाजारात आमची गरजच राहिली नाही. त्यामुळे विविध प्रकारचे दरवाजे, डिझाइन्स चौकटी असे काम करत असल्याचे लाकडी अवजारे बनवणारे कारागीर सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jun 12, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आता आमची गरज राहिली नाही, मग जगायचं कसं? शेती अवजारे बनवणाऱ्यांवर का आली अशी वेळ?








