कॅबिनेट बैठकीत कुरघोडीचं राजकारण, शिंदेंचा मंत्री म्हणाला, भाई CM असताना जसे निर्णय व्हायचे...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Cabinet Meeting Decision: मराठवाड्यावर कोसळलेले संकट मोठे आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या सदस्य मंत्र्यांनी बळीराजाच्या तत्काळ मदतीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रही भूमिका घेतली.
मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसहित सरकारमधील डझनभर मंत्र्यांनी आपत्तीग्रस्त भागांचा दौरा करून भरीव मदतीचे आश्वासन देऊनही अद्याप शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने त्यांचा सरकारवरील रोष वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे. वर्षांनुवर्षे सतत दुष्काळ पाहिलेल्या मराठवाड्याने प्रथमच अतिवृष्टी आणि महापूर पाहिला. मराठवाड्यावर कोसळलेले संकट मोठे आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या सदस्य मंत्र्यांनी बळीराजाच्या तत्काळ मदतीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रही भूमिका घेतली. एकप्रकारे त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
पिढ्यानपिढ्या मराठवाड्याच्या वाट्याला दुष्काळ आला. पाण्याची वाणवा असल्याने रोजगारासाठी स्थलांतरितांचे जगणे अनेकांच्या वाट्याला आले. त्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचा मुद्दा गाजत असतो. आत्ता कुठे पारंपारिक वाट सोडून मराठवाडा कूस बदलू पाहत होता. मात्र यंदाच्या पावसाने मराठवाड्यावर आभाळ कोसळले. शेतजमीन खरडून गेली, पिकांचे मोठे नुकसान झाले. पशुधन वाहून गेले. शेतात मातीही उरली नाही. अशा स्थितीत नियम, अटी शर्ती बाजूला ठेवून मदत सरकारने मदत करायला हवी, अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतली.
advertisement
शिंदेंचा मंत्री म्हणाला, भाई CM असताना जसे निर्णय व्हायचे...
विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारमधील पक्षांमध्येच चढाओढ आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीकाळात शेतकऱ्यांना जशी भरघोस मदत करण्यात आली होती, तशी मदत आत्ता झाली पाहिजे, असे म्हणत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जाहीर मदत पुरेशी नसल्याचेच सूचित केले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा दाखला देऊन त्यांच्यावर आलेले संकट अधोरेखित करून शिवसेना पक्षाने बळीराजाच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणल्याचे चित्र आजच्या कॅबिनेट होते.
advertisement
सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण
सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड रोष आहे. दुसऱ्या बाजूला संकटातली संधी हेरून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने तत्काळ आपत्तीग्रस्त भागांत मदत पोहोचवल्याने त्यांच्याविषयी सहानुभूतीचा सूर लोकांमध्ये आहे. हेच ओळखून शेतकऱ्यांच्या मनात शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बळीराजाच्या बाजूने आग्रही भूमिका घेण्याचे ठरवले आहे. यामधून ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करतील. एकंदर सरकारमधील पक्षांची आपणच बळीराजाचे तारणहार आहोत, हे दाखविण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॅबिनेट बैठकीत कुरघोडीचं राजकारण, शिंदेंचा मंत्री म्हणाला, भाई CM असताना जसे निर्णय व्हायचे...