जळगावात भीषण अपघात, कबीर मठातील प्रियरंजनदास यांचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून 'रास्ता रोको'
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Accident in Jalgoan: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ एका भीषण अपघात झाला आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी एरंडोल: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ एका भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कबीर मठातील प्रियरंजनदास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गावरून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही बातमी गावात पसरताच, संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन सुरू केले. प्रियरंजनदास यांच्या निधनामुळे ग्रामस्थ शोकाकुल आणि आक्रोशित झाले. त्यांनी या महामार्गावर वारंवार अपघात घडत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
या आंदोलनादरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे समांतर रस्ता आणि उड्डाणपूल तातडीने बांधण्याची मागणी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
advertisement
या अपघाताची माहिती मिळताच, एरंडोलचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर जवळपास एक तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या अपघातामुळे पिंपळकोठा परिसरात सध्या शोककळा पसरली असून, प्रियरंजनदास यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Aug 22, 2025 6:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावात भीषण अपघात, कबीर मठातील प्रियरंजनदास यांचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून 'रास्ता रोको'










