कोल्हापूरकर सतर्क राहा, राधानगरीचे 7 दरवाजे उघडले, त्यात 2 दिवस ऑरेंज अलर्ट!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
31 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा इथली पाणीपातळी 43 फूट 4 इंच एवढी होती. म्हणजेच पंचगंगा धोका पातळीजवळून वाहतेय. अशात हवामानशास्त्र विभागानं राज्यात 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापुरातील जनजीवन पुराचा फटका सोसल्यानंतर आता कुठं पूर्वपदावर यायला सुरूवात झाली, मात्र 31 जुलै रोजी सकाळीच राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडले. यंदा पहिल्यांदाच हे दरवाजे उघडले असून त्यातून प्रचंड प्रमाणात भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
advertisement
कोल्हापुरात पंचगंगेसह सर्वच नद्या, नाले, ओढे दमदार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. पात्राबाहेर पडलेल्या नद्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्यानं हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं. पाऊस ओसरल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीनं घट होत होती. शिवाय पाणी साचल्यानं बंद झालेले काही रस्तेसुद्धा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मात्र आता राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यानं पूरस्थिती पुन्हा गंभीर होऊ शकते अशी भीती आहे.
advertisement
सकाळी उघडले 7 दरवाजे!
जोरदार पावसामुळे काही दिवसांपूर्वी राधानगरीचे 5 दरवाजे उघडून नंतर हळूहळू बंद होऊ लागले होते. मात्र 31 जुलै रोजी धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे सकाळी 4.50 वाजता 5 नंबरचा दरवाजा उघडला. पुढे सकाळी 4.53 वाजता 3 नंबरचा दरवाजा, सकाळी 5.16 वाजता 4 नंबरचा दरवाजा, सकाळी 5.33 वाजता 1 नंबरचा दरवाजा आणि सकाळी 5.55 वाजता 2 नंबरचा दरवाजा असे सकाळी 6 वाजता सर्व 7 दरवाजे ( क्र.1,2,3,4,5,6,7) उघडण्यात आले.
advertisement
या दरवाजांमधून एकूण 10,000 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक असं मिळून एकूण 11,500 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. परंतु धरणातून कोल्हापूर शहरापर्यंत पाणी पोहोचण्यास 10 ते 12 तासांचा अवधी लागू शकतो. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ टीम सतर्क असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
advertisement
हेही वाचा : कोल्हापुरातील कित्येक हेक्टर ऊस पुराच्या पाण्यात, पाहा कसे कमी करता येऊ शकते होणारे नुकसान
दरम्यान, 31 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा इथली पाणीपातळी 43 फूट 4 इंच एवढी होती. म्हणजेच पंचगंगा धोका पातळीजवळून वाहतेय. अशात हवामानशास्त्र विभागानं राज्यात 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार, 1 ऑगस्टपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर, 1 आणि 2 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 31, 2024 10:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरकर सतर्क राहा, राधानगरीचे 7 दरवाजे उघडले, त्यात 2 दिवस ऑरेंज अलर्ट!