Maharashtra Elections : पुतण्याकडून पराभवाचा धोका? बारामतीत अजितदादांनी शेवटच्या टप्प्यात रणनीती बदलली?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections Ajit Pawar : प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अजित पवारांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे : यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात काही मतदारसंघातील लढती या लक्षणीय ठरणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या या वादाचा आता नवा अंक सुरू झाला आहे. काका, शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामती विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अजित पवारांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मागील अडीच वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये अभूतपूर्व फूट पडली. या फुटीमुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडीला यश मिळाले. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुनेत्रा पवार यांना अजित पुवारांच्या बारामती विधानसभा क्षेत्रात पिछाडीवर राहावं लागलं. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघातून 48 हजार मतांची आघाडी मिळवली. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली.
advertisement
दादांचा गावभेट दौरा...
अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावभेट दौरा आयोजित केला. त्यानुसार, त्यांनी काही गावांमध्ये जात ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या आणि आपण केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली. त्याशिवाय, लोकसभेता सुप्रियाला मते देऊन तुम्ही शरद पवारांना खूश केलं आणि आता विधानसभेला मला खूश करा असे आवाहन केले. अजित पवार यांनी प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवारांना थेट लक्ष्य करणे टाळले होते. त्याशिवाय, भाजपनेही पवारांवर कोणतीही मोठी टीका केली नाही.
advertisement
शरद पवार विरुद्ध अजित दादा
या विधानसभा निवडणुकीत जवळपास 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा मुकाबला आहे. अजित पवारांना आपल्यासोबत आलेल्या आमदारांना विजयी करण्याचे आव्हान आहे. तर, दुसरीकडे शरद पवार यांनी अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना पाडण्याचा चंग केला आहे. पवारांकडून अजितदादा गटाचे पाच मोठे नेते रडावर आहेत.
अखेरच्या टप्प्यात रणनीती बदलली?
advertisement
अजित पवारांनी आपल्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रणनीतीत बदल केले असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी युगेंद्र पवारवर हल्लाबोल केला. तर, दुसरीकडे लोकसभेत मी जी चूक केली तीच चूक पवार साहेब करत असल्याचे भावनिक वक्तव्य केले. अजित पवारांनी आपल्या मोजक्याच भाषणात मोजक्याच वाक्यात शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याबाबत बोलताना काकींना नेमकी यावेळेस प्रचाराला का उतरावे लागले असा सवाल केला होता. आता, अजित पवार यांनी आणखी भावनिक आव्हान करताना आपण शरद पवारांना सोडून गेलो नसल्याचा दावा कला. आपण अजूनही शरद पवारांसोबत असून त्यांच्याशी वैचारिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. तर, आपण आमदारांच्या दबावामुळे भाजपसोबत गेल्याचे वक्तव्य त्यांनी केले. अजित पवारांकडून सारवासारव सुरू आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांवर टीका न करण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून सुरू आहेत. त्याशिवाय, आपण शरद पवारांना सोडून गेलो नाही, त्यांच्या विचारांवर काम करत असल्याचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना धोका दिल्याचा, अथवा त्यांची साथ सोडल्याच्या मुद्याची धार होईल आणि परिणामी मतदानाच्या दिवशी कमी नुकसान होईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
November 17, 2024 1:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : पुतण्याकडून पराभवाचा धोका? बारामतीत अजितदादांनी शेवटच्या टप्प्यात रणनीती बदलली?


