Snakes : पावसाळा संपला तरी सर्पदंशाचा वाढता धोका, महाराष्ट्रात इथं 26 दिवसांत 21 जनांना दंश
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पावसाळा ओसरल्यानंतरही नागपूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत.
नागपूर : पावसाळा ओसरल्यानंतरही नागपूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शेतातील कापणी, मशागत आणि रब्बी हंगामाची तयारी यामुळे शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेतात मजुरी करत आहेत. या काळात 1 ते 26 ऑक्टोबर दरम्यान केवळ घोणस सापानेच 21 जणांना दंश केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. याशिवाय कोब्रा (नाग), मण्यार आणि फुरसे या विषारी प्रजातींच्या सापांचे दंशही काही ठिकाणी नोंदवले गेले आहेत.
शेतात कोणत्या सापाचा धोका?
या दिवसांत शेतकरी पिकांच्या कामात गुंतलेले असताना घोणस साप मोठ्या प्रमाणात आढळतो. मातीच्या रंगासारखा असल्याने तो सहज नजरेत न येणारा आणि चुकून पायाखाली आल्यास तत्काळ चावणारा असल्याने या प्रजातीमुळे दंशाचे प्रमाण जास्त असल्याचे सर्पमित्रांचे निरीक्षण आहे.
advertisement
रात्री सक्रिय असणारा साप कोणता?
सर्पतज्ञांच्या माहितीनुसार, मण्यार हा पूर्णतः निशाचर आणि अतिविषारी साप असल्याने तो बहुतेकदा रात्री मानवी वस्त्यांच्या परिसरात सक्रिय असतो. काही प्रकरणांत तो घरात घुसून रात्री झोपलेल्या व्यक्तींना चावतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी जमिनीवर झोपणे टाळून पलंग किंवा खाटेवर झोपण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
साप दिसल्यास काय करू नये आणि काय करावे?
1. साप मारण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नका.
advertisement
2. झाडफूंक, ताईत, औषधी पानं किंवा मंत्रोच्चार यावर अवलंबून राहणे टाळा.
3. दंशाच्या जागी चाकूने जखम करणे किंवा रक्त काढणे टाळावे.
काय करावे?
1. त्वरित सर्पमित्रांना किंवा आपत्कालीन सेवांना संपर्क करा.
2. जागीच प्रकाशव्यवस्था करून परिसर सुरक्षित ठेवा.
3. दंश झाल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात पोहोचणे आणि अँटी-व्हेनम उपचार सुरू करा.
advertisement
सप्टेंबरमध्ये आकडा चाळीशीपार
सर्पमित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये नागपूर जिल्ह्यात एकूण 42 सर्पदंश नोंदवले गेले. यापैकी 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर एम्स मिहान येथे 1 आणि वाडी परिसरात घरच्या घरी 1 मृत्यू झाल्याची नोंद आहे.
अँटी-व्हेनम हाच खरा उपचार
view commentsसर्पतज्ज्ञांचा ठाम सल्ला असा की, साप चावल्यावर एकही मिनिट वाया घालवू नये. ग्रामीण भागातील काही ठिकाणी आजही पारंपरिक उपचारांवर वेळ वाया जातो आणि त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात पडतो. अँटी-व्हेनमशिवाय उपचार शक्य नाहीत, हे ग्रामीण भागात जनजागृतीद्वारे पोहोचविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पायात बूट घालूनच शेतात काम करावे. दंश झाल्यास थेट शासकीय रुग्णालयात जाणे हाच जीव वाचवण्याचा सुरक्षित मार्ग आहे, असे नितीश भांदक्कर, वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सचिव यांनी सांगितले.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 27, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/नागपूर/
Snakes : पावसाळा संपला तरी सर्पदंशाचा वाढता धोका, महाराष्ट्रात इथं 26 दिवसांत 21 जनांना दंश


