महाराष्ट्रातलं पहिलं ‘राष्ट्रगीताच गाव’, दररोज होतो इथं जागर, तुम्हाला माहितीये का?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राष्ट्रगीताचा दररोज जागर करत देशप्रेम जागृत ठेवणारे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे पहिलेच गाव.
सांगली: "जन गण मन" आपल्या प्रिय भारत देशाच्या भौगोलिक, सांस्कृतिक वारशासह विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणारे गीत. अवघ्या 52 सेकंदात देशप्रेम जागृत करणारं रवींद्रनाथ टागोर लिखित भारतीय राज्यघटनेतील अधिकृत असे राष्ट्रगीत आपण प्रत्येक भारतीय ताठ मानेने आणि अभिमानाने गातो. याच राष्ट्रगीताचा दररोज जागर करत देशप्रेम जागृत ठेवणारे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे पहिलेच गाव.
सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील भिलवडी दहा हजारांहून अधिक लोकवस्तीचे गाव आहे. कृष्णामाईच्या तीरावर वसलेल्या या गावास महत्त्वपूर्ण सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा लाभला आहे. जल, जमीन आणि कष्टाने समृद्ध असलेल्या भिलवडीच्या ग्रामविकासाची उत्तम जडणघडण पहायला मिळते. समृद्ध शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसह गावाला व्यापारी बाजारपेठेच्या प्रवाही अर्थव्यवस्थेची परंपरा देखील लाभली आहे. यासह भिलवडी गाव आता राष्ट्रगीताचं गाव म्हणून लौकिक मिळवत आहे. भिलवडी राष्ट्रगीताचं गाव कसं बनलं? याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी लोकल 18 च्या प्रतिनिधींनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भिलवडीकर ग्रामस्थांनी राष्ट्रगीत वंदनेच्या उपक्रमाची अभिमानाने माहिती दिली.
advertisement
राष्ट्रगीत वंदनेच्या उपक्रमाची सुरुवात दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून आणि व्यापारी एकता असोसिएशनच्या सहकार्यातून झाल्याचे ग्रामस्थ समीर कुलकर्णी यांनी सांगितले.
कोरोना काळात हवी होती सकारात्मक ऊर्जा
कोरोना काळामध्ये सर्व बाजारपेठा दीर्घकाळ बंद होत्या. लोकांमध्ये निराशा वाढत होती. तेव्हा लोकांना सकारात्मक ऊर्जेची गरज होती. मग सकारात्मकता कशी ठेवता येईल याबाबत विचार करताना दक्षिणेतील एका गावामध्ये असलेल्या राष्ट्रगीत वंदनेच्या उपक्रमाबद्दल समजले. संकल्पना आवडली आणि कोरोनाकाळात सन 2020 च्या स्वातंत्र्य दिनापासून आम्ही ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांना सोबत घेऊन आदर्श उपक्रम सुरू केला, असे उपक्रमाचे संकल्पक दीपक पाटील सांगतात.
advertisement
अशी देतात राष्ट्रगीतास मानवंदना
रोज सकाळी गावातील व्यापारी बाजारपेठेची सुरुवात होण्याआधी दिन विशेष, त्यावर आधारित प्रेरणादायी गाणे आणि बरोबर 9 वाजून 10 मिनिटांनी राष्ट्रगीत लावले जाते. व्यापारी संघटनेच्या पब्लिक ॲड्रेस सिस्टिमवरुन राष्ट्रगीताची धून वाजते आणि सर्व व्यापारी, ग्रामस्थ अभिमानाने स्तब्ध होऊन राष्ट्रगीत गात मानवंदना देतात.
राष्ट्रगीत वंदनेचा नित्यक्रम आमच्या मनावर उमटला आहे. राष्ट्रगीत वंदनेनंतरच आमच्या कामाची सुरुवात होते, असे ग्रामस्थ इम्रान जमादार अभिमानाने सांगतात. यासह दररोज नवी प्रेरणा मिळत असल्याने आम्ही हा उपक्रम अशाच उत्साहाने सुरू ठेवणार असल्याचे मत भिलवडीकर महिला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
advertisement
15 ऑगस्ट 2020 अखंड नित्यक्रम सुरूच
गावातील व्यापारी संघटनेने सुरू केलेली राष्ट्रगीताची परंपरा 2020 पासून अखंडितपणे सुरु आहे. खरंतर भिलवडी हे कृष्णा नदीच्या अगदी काठावरचं गाव. गावाने आजवर कित्येक महापूरांना धैर्याने तोंड दिले आहे. अशाच महापूराने भिलवडीकरांच्या देशभक्तीची देखील परीक्षा घेतली. महापुरामध्ये व्यापारी पेठेमध्ये पाणी भरते. राष्ट्रगीताची पब्लिक ॲड्रेस सिस्टिम पेठेतील दुकानांमध्ये आहे. तेव्हा राष्ट्रगीत वंदनेचा नित्यक्रम खंडित होतो की काय! अशी स्थिती होती पण भिलवडीकर व्यापारी संघटनेचा निश्चय महापुराहून दृढ ठरला. आणि कमरेएवढ्या पाण्यातून दीपक पाटील यांनी राष्ट्रगीताची धून सुरू करत गावाला सकारात्मकता दिली.
advertisement
भिलवडिकरांचा एकोपा कायम
15 ऑगस्ट 2020 पासून राष्ट्रगीत वंदनेच्या नित्यक्रमाला संपूर्ण गाव एकोप्याने जपते आहे. राष्ट्रगीत वंदनेच्या उपक्रमातून गावकऱ्यांना सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच यासह त्यांच्या शांतताप्रिय एकोप्यातून देशभक्तीचा नवा पाठ पहायला मिळतो, असे भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शौकत इनामदार सांगतात.
भिलवडीतील व्यापाऱ्यांसह, सर्वच ग्रामस्थांना राष्ट्रगीत वंदनेचा नित्यक्रम अंगवळणी पडलेला दिसतो. आता सकाळच्या प्रसन्न वातावरणात देशभक्तीपर गीतांची स्फूर्ती घेत दुकान उघडणे, झाडलोट करणे, आवराआवर करून बरोबर 9 वाजून 10 मिनिटांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि राष्ट्रगीत वंदनेनंतर कामाला सुरुवात करणे असाच भिलवडिकरांचा दिनक्रम ठरला आहे.
advertisement
भिलवडीतील कृष्णा काठापासून मशिदी पर्यंत लहान-मोठे साडेचारशे-पाचशे व्यापारी आहेत. यांच्यापैकी प्रत्येकाचे व्यवहार राष्ट्रगीत वंदनेने सुरू होतात. संपूर्ण व्यापारी पेठेसह गावातील, गल्ली-बोळे देखील 9 वाजून 10 मिनिटांनी स्तब्ध होतात. यापूर्वीही देशातील काही गावांनी असा उपक्रम सुरू केला होता. परंतु भिलवडी इतके सातत्य आजवर कोणी ठेवले नसल्याचे देखील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे देशातील कदाचित दुसरे आणि महाराष्ट्रातील मात्र राष्ट्रगीताचे पहिलेच गाव भिलवडी असल्याचा दावा भिलवडीकर ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.
advertisement
गावकऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेसह देशप्रेम जागृत ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे गावकरी अभिमानाने सांगतात. भिलवडी गावातील व्यापारी एकता असोसिएशनने 15 ऑगस्ट 2020 पासून देशभक्तीचा नित्यक्रम सुरू ठेवला आहे. देशभरातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावर राष्ट्रगीताचं गाव म्हणून नावारूपास आलेल्या कृष्णाकाठच्या भिलवडीसह अलिकडे सांगली जिल्ह्यातील विसापूर, कर्नाळ आणि कुंडल अशा प्रेरणादायी गावांनी देश प्रेमाचा नित्यक्रम सुरू केलेला दिसतो. दीपक पवार यांच्या संकल्पनेतून आणि व्यापारी बांधवांच्या सहकार्यातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरुवात झालेला देशप्रेमाचा नित्यक्रम प्रत्येक गावासाठी आदर्श ठरतो आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 11:44 AM IST
मराठी बातम्या/सांगली/
महाराष्ट्रातलं पहिलं ‘राष्ट्रगीताच गाव’, दररोज होतो इथं जागर, तुम्हाला माहितीये का?








