Wardha Lok Sabha : वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर? तडस हॅटट्रिक करणार की काळे दिल्ली गाठणार?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
वर्ध्यात झालेली लोकसभेची निवडणूक अनेक कारणांनी अत्यंत चुरशीची ठरली. यापूर्वी १९९९ आणि २००४ मधील निवडणूक अशाच पद्धतीने चुरशीची झाली होती.
वर्धा, नरेंद्र मते, प्रतिनिधी : वर्ध्यात झालेली लोकसभेची निवडणूक अनेक कारणांनी अत्यंत चुरशीची ठरली. यापूर्वी १९९९ आणि २००४ मधील निवडणूक अशाच पद्धतीने चुरशीची झाली होती. दोन्ही निवडणुकीत विजयी उमेदवारांचे मताधिक्य दहा हजारांच्या आत होते. यंदाही तीच स्थिती असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांना आता ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा आहे.
वर्ध्यात महायुती व महाविकास आघाडीतील धुसपूस
भाजपाकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच यादीत त्यांचं नाव आल्याने उमेदवारीच्या शर्यतीत असणाऱ्या माजी खा. सुरेश वाघमारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर विरोध केला. भाजपकडून याची गंभीर दखल घेत सुरेश वाघमारे यांना समज देण्यात आली. परंतु वाघमारे यांची नाराजी रामदास तडस यांना अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरू शकते अशीही चर्चा आता ऐकायला मिळतं आहे.
advertisement
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागल्याचं चित्र वर्धा लोकसभा क्षेत्रात बघायला मिळालं. हीच बाब हेरत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी आ. अमर काळे यांना आपल्या पक्षात आणलं. अमर काळे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी वर्ध्याची ओळख आहे, मात्र हा मतदारसंघ शरद पवार यांनी काँग्रेसकडून हिसकावून घेतला त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वातावरण होतं.
advertisement
नियोजनाचा अभाव
महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये निययोजनाचा अभाव दिसून आला. भाजपाची शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख आहे. मात्र याच पक्षात सर्वात मोठा नियोजनाचा अभाव दिसून आला. अनेक गावात मोठी मतदार संख्या असतानाही त्या गावात प्रचाराची एकही गाडी फिरकली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालं. मात्र तरुण कार्यकर्त्यांनी अमर काळे यांच्यासाठी पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
advertisement
१९९९ मध्ये काँग्रेसच्या दिवंगत प्रभा राव आणि भाजपचे सुरेश वाघमारे यांच्यात लढत झाली. त्यावेळी प्रभा राव यांनी वाघमारे यांचा केवळ सात हजार ५९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी तब्बल एक लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती. नंतर २००४ मध्ये भाजपचे सुरेश वाघमारे यांनी काँग्रेसच्या उमेदवार व माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांना केवळ तीन हजार १८८ मतांनी पराभूत केले होते. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतातील फरकापेक्षा त्यावेळी बसपाचे सोमराज तेलखेडे यांना ५४ हजार, सीपीएमचे यशवंत झाडे यांना १४ हजार, शिवराज्य पार्टीचे जगन्नाथ राऊत यांना नऊ हजार, एआरपीचे श्रीकृष्ण उबाळे यांना सहा हजार ९९१, तर गोंगपाचे नारायण चिडाम यांना पाच हजार ५३५ मते मिळाली होती.
advertisement
१९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या दोन्ही निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील फरकापेक्षा रिंगणातील इतर उमेदवारांना जादा मते मिळाली होती. दोन्ही निवडणुका अत्यंत अटीतटीच्या झाल्या होत्या. निकालापर्यंत नेमके कोण विजयी होणार, याचा अंदाज येत नव्हता. नेमकी तीच स्थिती २०२४ च्या निवडणुकीत दिसून येत आहे. यावेळी महायुतीचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे अमर काळे यांच्यात चुरशीची लढत झाली.
advertisement
वाढीव मतदानाचा लाभ कुणाला ?
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्ध्यासह देवळी, आर्वी, हिंगणघाट आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यावेळी मतदारसंघात १६ लाख ८२ हजार ७७१ मतदारांपैकी १० लाख ९१ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ६४.८५ आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ६१.५३ टक्के मतदान झाले होते. यावेळी ३.३२ टक्के मतदान जास्त झाले. या वाढीव मतदानाचा लाभ कुणाला झाला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यासाठी आता चार जूनची वाट पाहावी लागणार आहे.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
May 20, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha Lok Sabha : वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर? तडस हॅटट्रिक करणार की काळे दिल्ली गाठणार?










