छत्री रेनकोट काहीच नाही पुरणार! ५ दिवस महाराष्ट्रात तुफान गारपिटीचा अलर्ट, पाकमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे नवं संकट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान उत्तराखंडकडून पुढे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी विक्षोभ दक्षिणेकडे सरकत आहे. इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन देखील त्या पाठोपाठ तयार होत आहे.
राज्यात सध्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरु झाला आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. सोलापुरात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मोहोळ आणि पापरी गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केले आहे.
पिकांना मोठं नुकसान
या पावसामुळे केळी, द्राक्ष, शेवगा, डाळिंब आणि कांदा पिकांना मोठा फटका बसला आहे.चांदवड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. पावसाचा फटका काढणीला आलेला गहू, हरभरा आणि काढून ठेवलेल्या कांद्याला बसला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही पाऊस राहण्याची शक्यता आहे. एकीकडे पाऊस पडत असताना मुंबई उपनगरात खूप जास्त उकाडा वाढला आहे.
advertisement
का पडतोय गारपिटीचा पाऊस
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान उत्तराखंडकडून पुढे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी विक्षोभ दक्षिणेकडे सरकत आहे. इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन देखील त्या पाठोपाठ तयार होत आहे. जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून भारताकडे पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम उत्तर भारतात होणार आहे. हे वारे दक्षिणेकडे पुढे सरकत असून त्याचा परिणाम पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे. दक्षिण भारतात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पाकिस्तानकडून येणारे वारे भारतातून पुढे पूर्वेकडे सरकताना दिसतील. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम आणखी दिसून येईल. कोकणात पावसाची तुरळक शक्यता आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा पाच दिवस अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कुठे कुठे पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं लहरी हवामान थांबण्याचं नाव घेत नाहीये. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः ३० आणि ३१ मार्च रोजी पावसाचा जोर अधिक राहणार असून, काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात.
advertisement
३० आणि ३१ मार्च रोजी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा घाटमाथा परिसर सांगली आणि सोलापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोकणात पाऊस
कोकणात मुसळधार पावसामुळे हाल बेहाल झाले आहेत. चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार झालेल्या पावसानं आंबा आणि काजूच्या बागांचं नुकसान झालं. तर दुसरीकडे लांजा शहरात तर या अवकाळी पावसाने गारपिटीचे रूप घेतले. मोठ्या प्रमाणात गारा कोसळल्यामुळे रस्ते आणि मोकळ्या जागांवर पांढऱ्या गारांचा सडा पडल्याचे चित्र दिसून आले.सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस कोसळला. पावसासोबतच विजांचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात झाला. काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्री रेनकोट काहीच नाही पुरणार! ५ दिवस महाराष्ट्रात तुफान गारपिटीचा अलर्ट, पाकमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे नवं संकट








