उरुळी कांचनकरांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वे स्टेशनजवळील महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Last Updated:
Uruli Kanchan Road Close Update : उरुळी कांचन येथील नवमोरीखालील रस्ता सोमवारपासून 14 दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात रेल्वे उड्डाणपुलाखालील मोरीचे डागडुजीचे काम सुरू होणार आहे.
उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या नवमोरीचे दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. पुणे विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की 22 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबरपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे.
उरुळी कांचन हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असून या गावाची मोठी बाजारपेठ परिसरातील अनेक गावांना जोडते. दौंड, पुरंदर आणि हवेली तालुक्यातील व्यापारी नियमितपणे या बाजारात येत असतात. सुमारे 25 ते 30 गावांचा प्रवास या बाजारपेठेशी संबंधित आहे. नवमोरीच्या बोगद्यातून दत्तवाडी, टिळेकरवाडी, खामगाव टेक, भवरापूर, अष्टापूर आणि हिंगणगावसारख्या गावांना जाणारा रस्ता जातो. हा रस्ता खूप व्यस्त असून अनेक गावांचे लोक याच मार्गावरून ये-जाऊ करतात.
advertisement
रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की, नवमोरीच्या पुलाखाली डागडुजी आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागेल. या कामांमुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागेल. रस्ता 6 ऑक्टोबरपासून पुन्हा वाहतुकीसाठी सुरु होईल. रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या असुविधेबद्दल दिलगीर व्यक्त केली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
यादरम्यान नागरिकांना 3 ते 4 किलोमीटर जास्त अंतराचा वळसा घालावा लागणार आहे. उरुळी कांचन किंवा पुणे-सोलापूर रस्त्याकडे जाण्यासाठी कोरेगाव मूळ येथील रेल्वेगेटचा वापर करावा लागणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाढेल, गाडीतील इंधन अधिक खर्च होईल आणि नागरिकांच्या आर्थिक खर्चातही वाढ होऊ शकते.
advertisement
दरम्यान सरपंच ऋतुजा कांचन यांनी उरुळी कांचन रेल्वे कॉलनी आणि तुपेवस्ती परिसरातील ओढा तसेच ड्रेनेज साफ करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे ओढा गाळाने भरला आहे आणि पावसाचे पाणी रेल्वे कॉलनी आणि तुपेवस्ती परिसरातील घरात शिरून नागरिकांचे नुकसान करीत आहे. सरपंचांच्या निवेदनानुसार दोन दिवसांच्या आत रेल्वे मोरी आणि चेंबरची साफसफाई करणे आवश्यक आहे. अन्यथा काही अनपेक्षित घटना घडल्यास त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर येईल. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, दुरुस्तीच्या कामांदरम्यान धैर्य बाळगा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करून सुरक्षित प्रवास करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 9:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
उरुळी कांचनकरांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वे स्टेशनजवळील महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?