Aadhaar Card : आधार कार्डबाबत मोठा निर्णय! पालकांनी तातडीने 'हे' काम करणे अनिवार्य, अन्यथा मुलांच्या शिक्षणात येणार अडचण
Last Updated:
Aadhaar Card Update: आधार कार्डसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे आधार कार्ड अपडेट न केल्यास शासकीय शिष्यवृत्ती, शालेय सुविधा आणि इतर महत्वाच्या योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे.
पिंपरी : विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांचे नाव शालेय यादीत असले तरी त्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे आधार तपासून तातडीने आवश्यक बदल अथवा नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
शासनाच्या नियमानुसार, विद्यार्थ्यांची माहिती यू-डायस प्लस (U-DISE Plus) पोर्टलवर असावी आणि शाळेकडे आधार क्रमांकाची वैध नोंद असणे बंधनकारक आहे. जर आधार प्रमाणीकरण वेळेत झाले नाही किंवा अंतिम मुदतीनंतर नोंदणी केली गेली, तर ती मान्य केली जाणार नाही. परिणामी, शासकीय शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, सायकली किंवा इतर शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकणार नाही.
advertisement
आधार प्रमाणीकरण का महत्त्वाचे?
आधार प्रमाणीकरणामुळे शासनाला खरी आकडेवारी मिळणार आहे. अनेक शाळांमध्ये बनावट विद्यार्थी दाखवून योजनांचा गैरफायदा घेतला जात असल्याचे लक्षात आले आहे. या प्रक्रियेमुळे अशा विद्यार्थ्यांचा पर्दाफाश होईल आणि प्रत्यक्षात शिक्षण घेणाऱ्या मुलांनाच लाभ मिळेल. यामुळे शाळांची खरी संख्या शासनापर्यंत पोहोचेल आणि शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता वाढेल.
जिल्ह्यातील चिंताजनक आकडे
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. यामध्ये तब्बल 10 हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच उपलब्ध नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी लाभापासून वंचित राहू शकतात, यामुळे पालकांमध्ये आणि शाळा व्यवस्थापनात प्रचंड चिंता आहे.
advertisement
शाळांच्या मान्यतेवर परिणाम
विद्यार्थ्यांची नोंद अपुरी राहिल्यास केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शाळांनाही फटका बसू शकतो. कारण कमी विद्यार्थी दाखवले गेल्यास शाळांची मान्यता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांनीदेखील याबाबत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.
पालकांसाठी आवाहन
पालकांनी विलंब न करता आपल्या मुलांचे आधार कार्ड तपासून घ्यावे, आवश्यक असल्यास त्यामध्ये सुधारणा करून घ्यावी आणि शाळेकडे योग्य माहिती द्यावी. अंतिम क्षणी गर्दी टाळण्यासाठी हा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे हितावह ठरणार आहे.
advertisement
शिक्षण विभागाकडून याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या असून, आधार प्रमाणीकरणाशिवाय कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी वेळ न घालवता ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 10:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Aadhaar Card : आधार कार्डबाबत मोठा निर्णय! पालकांनी तातडीने 'हे' काम करणे अनिवार्य, अन्यथा मुलांच्या शिक्षणात येणार अडचण


