Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारी 4 धरणं फुल्ल!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune News: पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरण प्रकल्पात आतापर्यंत 28.48 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या काही दिवसांत धरणातून जवळपास 23 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले, मात्र शनिवारी पाऊस थांबल्याने विसर्ग बंद करण्यात आला. दरम्यान, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग थांबवला
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. 21 ऑगस्ट रोजी खडकवासला धरणातून तब्बल 39 हजार 138 क्युसेक इतका सर्वाधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. शेवटी, पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने 30 ऑगस्टला धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. सध्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून 28.48 टीएमसी म्हणजेच 97.73 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
advertisement
यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढू लागला. त्यानंतर जूनमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे 16 जूनपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्या वेळी धरणांमध्ये सुमारे 30 टक्के पाणीसाठा होता. सध्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने मुठा नदीत विसर्ग सुरूच आहे. आतापर्यंत धरणांतून 22.83 टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण 33.35 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता.
advertisement
खडकवासला धरण परिसरात आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय वरसगाव धरणात 1930 मिमी, पानशेतमध्ये 1934 मिमी तर खडकवासला परिसरात 622 मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणातील साठ्यात चांगली वाढ झाली आहे.
खडकवासला प्रकल्पातील धरणे 97 टक्क्यांवर
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये एकूण 28.48 टीएमसी म्हणजेच 97.73 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये खडकवासला धरणात 1.55 टीएमसी (78.39 टक्के), पानशेतमध्ये 10.56 टीएमसी (99.12 टक्के), वरसगावमध्ये 12.68 टीएमसी (98.98 टक्के) आणि टेमघर धरणात 3.71 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 31, 2025 9:01 AM IST