छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलं होतं दर्शन, 15 डिसेंबरपासून पुण्यातलं प्रसिद्ध गणपती मंदिर बंद, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील मुख्य दैवताच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, या काळात मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील मुख्य दैवताच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, या काळात मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिराच्या उपलब्ध इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच होत असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त आशापूरक ठकार यांनी दिली. ऐतिहासिक स्वयंभू मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळू लागल्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रक्रिया साधारण तीन आठवडे चालण्याची शक्यता आहे. कामकाजाचा आढावा घेत मंदिर शक्य तितक्या लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा देवस्थानचा प्रयत्न राहणार आहे. याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊ.
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत असून, या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाबाई यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलं आहे. शिवकालापासून चालत आलेल्या परंपरेनुसार दर शनिवारी आणि बुधवारी मूर्तीवर शेंदूर लेपण केले जाते. या सततच्या लेपामुळे गेल्या चारशे वर्षांत मूर्तीवर जाड शेंदूराचे कवच तयार झाले. अलीकडे हे कवच निखळू लागल्याने मूर्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची कारवाई आवश्यक झाली.
advertisement
शेंदूर कवच काढण्याची संपूर्ण प्रक्रिया शास्त्रानुसार, धार्मिक विधी करून आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. मूर्तिशास्त्र तज्ञ, धर्मगुरू तसेच पुरातत्व विभागाकडूनही मार्गदर्शन घेतले गेले आहे. ही प्रक्रिया अत्यंत नाजूक असल्याने साधारण तीन आठवडे लागू शकतात. प्रत्यक्ष कामाच्या प्रगतीवर आधारित हा कालावधी कमी किंवा जास्तही होऊ शकतो.
advertisement
या दरम्यान मंदिरातील दैनंदिन पूजा आणि इतर धार्मिक विधी मूळ गाभाऱ्यातील मुख्य पूजेच्या मूर्तीशिवाय अन्य नियोजनबद्ध मार्गाने पार पाडले जाणार आहेत. मात्र भाविकांसाठी मंदिर परिसर संपूर्णपणे बंद राहील. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेंदूर कवच काढल्यानंतर मूर्ती आपल्या मूळ स्वरूपात दर्शनास येईल. ही पुणेकरांसाठी नवी आणि ऐतिहासिक अनुभूती असणार आहे. देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, कामाचा आढावा वेळोवेळी घेऊन मंदिर शक्य तितक्या लवकर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
advertisement
इसवी सन 1614 च्या आसपासच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये कसबा गणपतीचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जय मिळवून देणारा जयति गजानन असे वर्णन केलेल्या या देवस्थानाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात पहिल्या मानाच्या गणपती म्हणून या मंदिराचे विशेष महत्त्व असते.
श्रींच्या मूर्तीचे जतन, संरक्षण आणि भविष्याकरीता सुरक्षितता या उद्देशाने घेतलेला हा निर्णय पुणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. तीन आठवड्यांच्या या विशेष शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेनंतर भाविकांना मूळ रूपातील ग्रामदैवताचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. मंदिर प्रशासनाने पुणेकरांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलं होतं दर्शन, 15 डिसेंबरपासून पुण्यातलं प्रसिद्ध गणपती मंदिर बंद, कारण काय?






