शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याचे दर आणखी कडाडणार, बांगलादेशने घेतला मोठा निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. बांगलादेश सरकारने कांदा आयातीबाबत मोठा निर्णय घेत आयात परवान्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवली आहे. याआधी दररोज केवळ 50 आयात परवाने दिले जात होते, मात्र आता ही मर्यादा थेट 200 परवान्यांपर्यंत नेण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला वेग येण्याची शक्यता असून, त्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारभावांवरही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वीच बांगलादेश सरकारने अंतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 7 डिसेंबरपासून कांदा आयातीवर काही निर्बंध लागू केले होते. मात्र वाढती मागणी आणि बाजारातील तुटवडा लक्षात घेता, आता आयात परवान्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला पुन्हा एकदा मोठा बाजार खुला झाला आहे.
advertisement
बांगलादेशात भारतीय कांद्याची आवक वाढली
बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात पुन्हा सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सुमारे 1,500 टन कांदे तेथे दाखल झाले आहेत. यामुळे निर्यातीला चालना मिळाली असून, त्याचे पडसाद भारतातील घाऊक बाजारातही उमटू लागले आहेत. बांगलादेश सरकारचा हा निर्णय स्थानिक बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठी असला तरी, त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय शेतकऱ्यांना होणार आहे.
advertisement
बांगलादेशच्या सार्वजनिक माहिती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आयात परवान्याअंतर्गत 30 टनांपर्यंत कांदा आयात करण्याची मुभा आहे. आयात परवान्यांची संख्या चौपट झाल्यामुळे एकूण आयात क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, भारतीय कांदा उत्पादकांना अधिक प्रमाणात निर्यात करण्याची संधी मिळणार आहे.
advertisement
कांदा निर्यातीतील बांगलादेशचे महत्त्व
भारतीय कांदा निर्यातीमध्ये बांगलादेशचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशचा आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतातून बांगलादेशला सुमारे 4.80 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यात आली होती. या निर्यातीमुळे भारताला अंदाजे 1,724 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले होते. त्यामुळे बांगलादेशकडून आयात वाढवण्याचा निर्णय भारतीय कांदा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
निर्यात कधीपर्यंत सुरू राहणार?
बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, बाजारात स्थिरता येईपर्यंत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत ही आयात प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामुळे येत्या काळात कांद्याच्या निर्यातीमध्ये सातत्य राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये आशा
advertisement
कांदा निर्यातदारांचे म्हणणे आहे की आयात परवान्यांमध्ये झालेली वाढ निर्यातीसाठी पोषक ठरेल. मागणी कायम राहिल्यास निर्यात आणखी वाढेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. लासलगाव, पिंपळगाव यांसारख्या प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये सध्या पुरवठा नियंत्रित असल्याने दर हळूहळू सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, गेल्या काही आठवड्यांपासून बाजारभाव उत्पादन खर्चही भरून काढू शकत नव्हते. मात्र बांगलादेशकडून आयात वाढल्यास निर्यात खुली होईल आणि कांद्याच्या किमती वाढण्यास मदत होईल. हा निर्णय दीर्घकाळ टिकून राहिल्यास, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याचे दर आणखी कडाडणार, बांगलादेशने घेतला मोठा निर्णय











