Amravati Rain: अमरावतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला, शेतातला Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पावसामुळं अमरावती जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि जिवाचे हाल करून बनवलेले विश्व पावसामुळे विस्कटले गेले.
अमरावती: गेल्या चार ते पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस हा 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट या दोन दिवसांत झालाय. या पावसामुळं अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि जिवाचे हाल करून बनवलेले विश्व पावसामुळे विस्कटले गेले. माधान, सोनोरी या गावात ढगफुटी झाल्याने संपुर्ण गाव पाण्याने तुडुंब भरलेले होते. त्याच वेळी सर्फापूर, कारोडी या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्या पावसामुळं शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेय. शेत हे पावसामुळे खरडून निघाले. पिकं पाण्याखाली गेलीत. मोठमोठी झाडं कोसळली. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या पावसामुळं हिरावला गेला आहे. सर्वाधिक नुकसान हे कपाशी, तूर आणि संत्रा पिकाचे झाले असल्याचं शेतकरी सांगतात.
संत्र्याचे 40 टक्के नुकसान
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी लोकल18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, 15 ऑगस्ट रोजी या भागात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे आमच्या संत्रा पिकाला फार मोठा फटका बसलाय. जवळपास 15 वर्षांची झाडं होती. ती पूर्णतः मुळासकट बाहेर आलीत. संत्र्याची गळ भरपूर प्रमाणात झाली. 40 टक्के संत्रा जाग्यावर गळला आहे. छोटीशी कलम आणून तिला 15 वर्षांची होईपर्यंत मुलासारखी सांभाळावी लागते. खत, पाणी आणि इतर बहुतांश खर्च त्यामागे असतात. त्यातही जंगली प्राण्यांची भीती असते. सोकारी करून इथपर्यंत आणावं लागतं. तेव्हा कुठं आम्हाला फळ मिळतं. पण यावर्षी काही खरं दिसत नाही. या पावसामुळं भरपूर नुकसान आम्हाला सोसावं लागत आहे, असं ते सांगतात.
advertisement
शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं
पुढे ते सांगतात की, पाऊस तर सर्वच भागांत झालाय. पण, असं नुकसान होणारं आमचं गाव आहे. याकडे कोणाचही लक्ष नाही. एकही अधिकारी याठिकाणी पाहणीसाठी आलेला नाही. मेहनत करून सुद्धा शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यालाच माहीत. रात्रंदिवस केलेली मेहनत आज वाया गेली आहे. निसर्ग आमच्यावर कोपला आहे. आता आम्हाला शासनाकडून एकच मागणी आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्या साहेब. लाखो रुपये खर्च करून हा थाट आम्ही करत असतो, पण आता सर्वच पाण्यात गेलं आहे. शासनाने लवकरात लवकर यावर लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
August 18, 2025 4:00 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Amravati Rain: अमरावतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला, शेतातला Video