IND VS PAK : भारताचा एक निर्णय अन् पाकिस्तानवर येईल उपासमारीची वेळ! वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानला भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईची चिंता असली, तरी खरी झळ त्याच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या गैर-सैन्य उपाययोजनांमुळे बसू शकते.
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानला भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईची चिंता असली, तरी खरी झळ त्याच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या गैर-सैन्य उपाययोजनांमुळे बसू शकते. यातील सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलणे, ज्याचे परिणाम थेट पाकिस्तानच्या अन्न सुरक्षेपासून ते निर्यातीपर्यंत अनेक पातळ्यांवर होणार आहेत.
चिनाब नदीतील पाणीपुरवठा कमी,खरीप हंगाम धोक्यात
5 मे रोजी चेनाब नदीचा प्रवाह वर्षाच्या याच कालावधीतील सरासरीच्या केवळ निम्मा होता. पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाने (IRSA) चिंता व्यक्त करत सांगितले की, "भारताने कमी पाणीपुरवठा केल्यामुळे मारला येथे चेनाब नदीच्या प्रवाहात अचानक घट झाली असून याचा फटका खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे."
advertisement
यावर उपाय म्हणून IRSA ने जलाशयांचा संयुक्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने उर्वरित खरीप हंगामासाठी 21% पाणी कपात घोषित केली आहे.
भारताने अचानक सोडले पाणी, पूरस्थितीचा धोका
जिथे चेनाबमध्ये 5 मे रोजी पाणीपुरवठा फक्त 12,967 क्यूसेक होता, तिथे 8 मे रोजी भारताने अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे तोच प्रवाह 26,३६३ क्यूसेकवर पोहोचला. परिणामी, पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
advertisement
खरीप उत्पादनावर थेट परिणाम
पाकिस्तानमधील खरीप हंगामातील मुख्य पिके तांदूळ व कापूस या दोन्ही चिनाब नदीच्या जलस्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. ही उत्पादने फक्त देशांतर्गत खाद्य सुरक्षेसाठी नव्हे, तर पाकिस्तानच्या निर्यातीचा कणा आहेत.
पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागानुसार, 2023-24 मध्ये तांदळ आणि कापसावर आधारित वस्त्र निर्यातीतून एकूण निर्यातीच्या 63% महसूल मिळाला. विदेशी चलन मिळवण्यासाठी ही निर्यात अत्यावश्यक आहे, ज्यातून पेट्रोलियमसारख्या आयातीसाठी निधी उभारला जातो आणि स्थानिक चलनाचा समतोल राखला जातो.
advertisement
अर्थव्यवस्थेवर दुहेरी आघात
सध्या पाकिस्तान आधीच गंभीर आर्थिक संकटात आहे. देशाचा एकूण निर्यात उत्पन्न 2023-24 मध्ये केवळ 23 अब्ज डॉलर इतक्यावर घसरले आहे, जे चार वर्षांतील सर्वात कमी पातळी आहे.
या संकटात भर घालणारे दुसरे कारण म्हणजे भारतीय नौसेनेची अरबी समुद्रातील उपस्थिती, विशेषतः कराची बंदरासमोरील हालचाली,ज्या निर्यातीच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात.
advertisement
दरम्यान, पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेती उत्पादन घटणार, निर्यात कमी होणार, आणि अशांत सागरी मार्गांमुळे मालाची वाहतूक अडचणीत येणार या सगळ्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या आर्थिक स्थैर्यावर होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 12:30 PM IST