शेतीसह विजेच्या विक्रीतून शेतकऱ्यांना वर्षाला करता येणार 8 लाखांची कमाई, ते कसं?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : : बदलत्या हवामान परिस्थिती, वाढते उत्पादनखर्च आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अशा वेळी शेतीत तंत्रज्ञानाची जोड देत उत्पन्न वाढवणारी कृषी-व्होल्टेइक प्रणाली शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
मुंबई : बदलत्या हवामान परिस्थिती, वाढते उत्पादनखर्च आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अशा वेळी शेतीत तंत्रज्ञानाची जोड देत उत्पन्न वाढवणारी कृषी-व्होल्टेइक प्रणाली शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या आधुनिक पद्धतीमुळे एकाच शेतातून दुहेरी लाभ घेणे शक्य झाले असून, पिकांची लागवड सुरू ठेवत त्याच जागेत सौरऊर्जा निर्मिती करता येत आहे. विशेष म्हणजे या सौर यंत्रणेमुळे पिकांचे नुकसान न होता उलट उत्पादन वाढण्यास मदत होत असल्याने देशभरात ही प्रणाली वेगाने लोकप्रिय होत आहे.
advertisement
कृषी-व्होल्टेइक प्रणाली म्हणजे काय?
कृषी-व्होल्टेइक प्रणाली म्हणजे शेती आणि सौरऊर्जा निर्मिती यांचा एकत्रित वापर. या पद्धतीत शेतजमिनीवर विशिष्ट उंचीवर सौर पॅनल्स बसवले जातात, ज्यामुळे त्याखाली पिकांची लागवड करता येते. पॅनल्समधून निर्माण होणारी वीज शेतकरी स्वतः वापरू शकतात किंवा वीज वितरण कंपन्यांना विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. यामुळे शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा उत्पादकही बनतो.
advertisement
दररोज सरासरी 420 किलोवॅट-तास वीज निर्मिती
ही प्रणाली शेतात बसवण्यासाठी ठराविक नियोजन आवश्यक असते. साधारणपणे प्रति हेक्टर सुमारे 105 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला जातो. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या सौर पॅनल्सचा वापर करून ही यंत्रणा बसवता येते. या पॅनल्समधून दररोज सरासरी 420 किलोवॅट-तास वीज निर्मिती होते. तयार होणारी वीज विक्री केल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति हेक्टर सुमारे आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी होऊन उत्पन्नाचे स्थिर साधन उपलब्ध होते.
advertisement
कृषी-व्होल्टेइक प्रणालीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पाण्याचे संवर्धन. सौर पॅनल्सवर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून ते सिंचनासाठी किंवा पॅनल्स स्वच्छ करण्यासाठी वापरता येते. एका एकर क्षेत्रात पावसाळ्यात सुमारे दीड लाख लिटर पाणी साठवता येते. हे पाणी पुन्हा वापरात आल्याने भूजलावरील ताण कमी होतो आणि जलसंधारणाला चालना मिळते.
advertisement
सौर पॅनल्सच्या सावलीतही अनेक पिके चांगल्या प्रकारे वाढतात. मूग, गवार, मोठ, इसबगोल, जिरे, हरभरा, बटाटा, वांगी यांसारखी पिके या प्रणालीखाली घेता येतात. नियंत्रित सूर्यप्रकाशामुळे पिकांवरील उष्णतेचा ताण कमी होतो, ज्यामुळे उत्पादनात सातत्य राहते. तसेच सौर पॅनल्समुळे वन्य प्राणी आणि अति सूर्यप्रकाशापासून पिकांचे संरक्षण होते.
advertisement
अॅग्रीव्होल्टेइक प्रणालीमुळे शेतीच्या पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. मातीची धूप कमी होते, धुळीचे प्रमाण घटते आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. परिणामी मातीची सुपीकता वाढते आणि दीर्घकाळ उत्पादनक्षमता सुधारते. एकूणच, ही प्रणाली शाश्वत शेतीकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
एकाच शेतातून अन्न आणि ऊर्जा निर्मिती शक्य करून देणारी कृषी-व्होल्टेइक प्रणाली शेतकऱ्यांसाठी दुहेरी उत्पन्नाचे प्रभावी साधन बनत आहे. योग्य नियोजन आणि शासकीय सहकार्य मिळाल्यास हे तंत्रज्ञान ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ शकते, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:22 AM IST










