टॅरिफच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढून दर वाढणे अपेक्षित असताना, उलटपक्षी केळीचे दर प्रचंड घसरले आहेत.
विजय वाघमारे,प्रतिनिधी (जळगाव) : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढून दर वाढणे अपेक्षित असताना, उलटपक्षी केळीचे दर प्रचंड घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा वसूल होणे कठीण झाले असून, त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
व्यापाऱ्यांवर संगनमताचा आरोप
शेतकऱ्यांचा आरोप आहे की व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडले आहेत. सध्या केळीला केवळ 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याउलट, जुलै ते डिसेंबर या काळात, जेव्हा देशात सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात, तेव्हा दर सामान्यतः 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल मिळतात. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना थेट नुकसान सहन करावे लागत आहे.
advertisement
अमेरिकेच्या टेरिफचा बहाणा?=
व्यापारी अमेरिकेने भारतावर टेरिफ लादल्याचे कारण पुढे करत आहेत. परंतु शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा मुद्दा वास्तवाशी निगडित नाही. जळगावची केळी मुख्यत्वे आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते, अमेरिकेत नाही. त्यामुळे अमेरिकन टेरिफचा स्थानिक दरावर परिणाम होणे शक्यच नाही. शेतकऱ्यांच्या मते व्यापारी हे कारण पुढे करत जाणीवपूर्वक दर कमी ठेवत आहेत.
advertisement
उत्पादन खर्चही निघेना
केळी पिकासाठी सिंचन, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक यावर मोठा खर्च होतो. प्रति क्विंटल सरासरी खर्च 500 रुपयांहून अधिक येतो. अशा परिस्थितीत 300 ते 400 रुपयांचा दर मिळाल्यास शेतकऱ्यांना सरळसरळ तोटा सहन करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते बाकी आहेत. दर कोसळल्यामुळे हप्ते फेडणे, घरखर्च भागवणे आणि पुढील हंगामाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.
advertisement
सणासुदीच्या काळातही निराशा
जुलै ते डिसेंबर हा काळ देशातील सणासुदीचा असतो. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ख्रिसमस अशा सणांमुळे फळांना मागणी वाढते. जळगावची केळीही या काळात मोठ्या प्रमाणावर देशभर पुरवली जाते. मागणी वाढलेली असतानाही दर कमी ठेवले जात असल्याने शेतकरी आश्चर्यचकित आणि संतप्त आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
या परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवून दर स्थिर ठेवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अन्यथा हजारो शेतकरी उद्ध्वस्त होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याशिवाय, राज्य सरकारने निर्यात धोरणाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 1:04 PM IST