मुंबईपासून 1 हजार किमी अंतरावर 3.3 कोटी टन सोन्याचा साठा, 25 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार गोल्ड फील्ड्स
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Fields: कोलार गोल्ड फील्ड्समध्ये बंद पडलेल्या खाणींतील टेलिंग्स डंपमधून पुन्हा सोने काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेच्या मोनेटायझेशनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो, असे समितीचे मत आहे.
कोलार : कर्नाटकमधील ऐतिहासिक कोलार गोल्ड फील्ड्स (KGF) मधून पुन्हा एकदा सोने मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. संसदेच्या एका स्थायी समितीने केंद्र सरकारला भारत गोल्ड माइन्स लिमिटेड (BGML) कडे असलेल्या सुमारे 3.3 कोटी टन सोने-समृद्ध टेलिंग्ज डंपचे लवकरात लवकर मोनेटायझेशन करण्याचे निर्देश दिले आहेत. या खाणी 2001 पासून बंद आहेत, परंतु त्यातील टेलिंग्ज डंपमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात सोने आणि इतर मौल्यवान धातू असल्याचे समितीने नमूद केले आहे.
एका जुन्या खाणीची नवी कहाणी
कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात असलेल्या कोलार गोल्ड फील्ड्सचा इतिहास अत्यंत जबरदस्त आहे. अनेक दशके या खाणींमधून मोठ्या प्रमाणावर सोने काढले जात होते. हजारो कामगार आणि अभियंते येथे काम करत होते आणि संपूर्ण परिसर या खाण उद्योगावर अवलंबून होता. मात्र कालांतराने खनन खर्च वाढत गेला आणि सोने काढणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले. अखेर 2001 मध्ये BGMLच्या खाणी बंद करण्यात आल्या आणि तेव्हापासून हा परिसर जवळपास निद्रिस्त अवस्थेत आहे.
advertisement
टेलिंग्ज डंप म्हणजे काय?
खाण बंद झाल्यानंतरही तेथे एक महत्त्वाची गोष्ट शिल्लक राहिली ती म्हणजे टेलिंग्ज डंप. खनन प्रक्रियेनंतर उरलेला हा कचरा असतो ज्यामध्येठेचलेले दगड व खडक, पाणी,प्रक्रियेत वापरलेली रसायने हे घटक असतात.
विशेष म्हणजे या टेलिंग्ज डंपमध्ये अनेकदा थोड्या प्रमाणात सोने आणि इतर मौल्यवान धातू शिल्लक राहतात, जे आधुनिक तंत्रज्ञानाने पुन्हा काढता येऊ शकतात.
advertisement
3.3 कोटी टन टेलिंग्ज डंप
संसदेच्या कोळसा, खाण आणि पोलाद स्थायी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की KGF मध्ये सध्या सुमारे 33 दशलक्ष टन म्हणजेच 3.3 कोटी टन टेलिंग्ज डंप उपलब्ध आहे. यामध्ये इतक्या प्रमाणात सोने आणि मौल्यवान धातू आहेत की, ते पुन्हा प्रक्रिया करून काढणे शक्य आहे. यामुळेच समितीने सरकारला या डंपचे तातडीने मोनेटायझेशन करण्याची शिफारस केली आहे.
advertisement
सरकारला काय सांगण्यात आले?
संसदीय समितीने खाण मंत्रालयाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ही प्रक्रिया जलदगतीने पुढे नेण्यात यावी. या प्रकरणात होणाऱ्या प्रत्येक प्रगतीची माहिती समितीला देण्यात यावी तसेच सरकारने यासाठी एक ठोस कृती योजना तयार करावी.
BGML ची स्थापना आणि इतिहास
भारत गोल्ड माइन्स लिमिटेड (BGML)ची स्थापना एप्रिल 1972 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी खाण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग होती. कंपनीची मुख्य कार्ये कोलार गोल्ड फील्ड्समध्ये सोन्याचे खनन, आंध्र प्रदेशातील काही छोट्या प्रकल्पांमध्ये खनन करणे असे होते
advertisement
मात्र कालांतराने उत्पादन घटत गेले आणि खर्च वाढत गेल्याने कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली.
2006 मधील विक्री योजना
खाणी बंद झाल्यानंतर सरकारने 2006 मध्ये BGML च्या संपत्तीची जागतिक निविदेद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये माजी कर्मचाऱ्यांच्या सोसायटीला प्रथम हक्क देण्याचा प्रस्तावही होता. मात्र विविध कारणांमुळे ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
advertisement
सध्या सरकारची भूमिका काय?
खाण मंत्रालयाने सांगितले आहे की BGML च्या भविष्याबाबत सरकार विविध पर्यायांचा विचार करत आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात BGML च्या देखभालीसाठी 8.75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जे सरकारच्या या संस्थेबाबतच्या गांभीर्याचे द्योतक आहे.
पर्यावरणाचाही मोठा प्रश्न
टेलिंग्ज डंप हे केवळ आर्थिक संधी नाही, तर पर्यावरणासाठी एक मोठा धोका देखील आहे. यातील रसायने आणि धातू जमीन व भूजलावर विपरीत परिणाम करू शकतात. मात्र जर या डंपवर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली गेली तर पर्यावरणीय धोका कमी होईल. सोने आणि इतर मौल्यवान धातू पुन्हा मिळवता येतील तसेच स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
advertisement
KGF मध्ये पुन्हा सोन्याची घंटा वाजेल का?
एक काळ असा होता जेव्हा कोलार गोल्ड फील्ड्स हे भारताच्या सोन्याचा प्रमुख स्रोत होते. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. कचऱ्यात दडलेले सोने या परिसराला नवे जीवन देऊ शकते. जर सरकारने टेलिंग्ज डंपच्या मोनेटायझेशनची प्रक्रिया वेगाने राबवली, तर KGF पुन्हा एकदा देशाच्या खाण क्षेत्रात चर्चेचे केंद्र बनू शकते आणि कर्नाटकच्या या ऐतिहासिक भागाला एक नवी ओळख मिळू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 7:20 PM IST
मराठी बातम्या/मनी/
मुंबईपासून 1 हजार किमी अंतरावर 3.3 कोटी टन सोन्याचा साठा, 25 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार गोल्ड फील्ड्स









