शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी मोठ्या अपेक्षेने कर्ज काढून बियाणे, खतं आणि औषधांवर खर्च केला होता. परंतु सलग काही दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सर्व मेहनत पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोयाबीन पिकांवर आलेले फुलोरे आणि शेंगा पाण्याखाली गेल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडणार असून, येणाऱ्या दिवसांत त्यांच्या जगण्याची कठीण वेळ येण्याची शक्यता आहे.
advertisement
Farmer Success Story: तरुण शेतकऱ्याने केली 900 झाडांची लागवड, पालटलं नशीब, वर्षाला लाखात कमाई, Video
पावसामुळे रस्ते आणि शिवारांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. काही ठिकाणी सोयाबीन पिके संपूर्णपणे पाण्यात बुडालेली दिसून आली तर कापसाच्या पिकांची पाने गळून गेल्याचेही शेतकरी सांगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वसूल होणार नाही, उलट त्यांना मोठ्या कर्जाच्या विळख्यात अडकावे लागेल. शेतकऱ्यांच्या या अडचणींमुळे गावागावांत चिंता व्यक्त होत असून वातावरणात नैराश्य पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असून, झालेल्या नुकसानीची योग्य दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे जीवन सावरायचे असेल तर मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केली.