माती परीक्षण म्हणजे जमिनीतील पोषक तत्वांची, आम्लतेची (pH), आणि सेंद्रिय घटकांची वैज्ञानिक तपासणी होय. या प्रक्रियेच्या मदतीने जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक, आयर्न यांसारख्या घटकांचे प्रमाण कळते. या परीक्षणामुळे कोणते खत किती प्रमाणात आणि कोणत्या वेळेस द्यावे हे ठरवता येते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि पिकांचे उत्पन्न वाढते, असं कृषी अभ्यासक लहू चव्हाण सांगतात.
advertisement
Success Story : शेतकरी नव्हे CA वाल्या ताईंची कमाल, मराठवाड्यात यशस्वी केली केशरची शेती!
माती परीक्षणासाठी शेतकरी स्वतःही नमुना घेऊ शकतात. त्यासाठी शेतातील 6 ते 8 ठिकाणांहून 6 ते 9 इंच खोलीपर्यंत माती घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे. तयार नमुना सावलीत वाळवून स्वच्छ पिशवीत भरावा आणि त्यावर शेताची माहिती लिहून कृषी प्रयोगशाळेत पाठवावा. बीड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, तसेच जिल्हा कृषी कार्यालयांत ही सुविधा उपलब्ध आहे.
माती परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर केल्यास मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राखले जाते. उदाहरणार्थ, मातीतील नायट्रोजन कमी असल्यास युरियाचा वापर वाढवता येतो, तर जास्त आम्लता असल्यास सेंद्रिय खतांचा वापर अधिक परिणामकारक ठरतो. यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि दीर्घकाळ सुपीकता टिकून राहते, असं कृषी अभ्यासक लहू चव्हाण सांगतात.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दर दोन ते तीन वर्षांनी माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन केले आहे. जमिनीचे आरोग्य तपासल्याशिवाय शेती करणे म्हणजे अंदाजावर चाललेली शेती, असे मत कृषी अधिकारी व्यक्त करत आहेत. शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक उत्पादनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.





