अशीच एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे जी प्रेम, फसवणूक आणि जीवघेण्या कटकारस्थानाची आहे. ही कहाणी आहे खुशबू आणि शंकरची.
देवरियामधील खुशबू हिला गोरखपूरच्या शंकरशी प्रेम झालं. दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले की घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर सगळं सुरळीत सुरू होतं. शंकरने तिला हनिमूनला जायचं सुचवलं आणि ती खूश होऊन तयार झाली.
advertisement
हनिमूनचा बहाणा आणि धोका
दोघं मिळून झारखंडला गेले. तिथे धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं सगळीकडे फिरले, मजा केली. वाटत होतं, खरंच आयुष्य सुंदर आहे आणि दोघांनी लग्न करणं हा एक चांगला निर्णय आहे. पण शंकरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं…
परत येताना दोघांनी बनारस-बरकाकाना पॅसेंजर ट्रेन पकडली. रात्रीचा वेळ होता. शंकरने गोडगोड बोलून खुशबूला ट्रेनच्या दरवाज्यापाशी नेलं आणि अचानक तिला धक्का मारण्याचा प्रयत्न केला! खुशबूने त्याचे पाय पकडले, विनवणी केली "शंकर, मला मारू नको!" पण त्यानं ऐकलंच नाही. त्यानं तिला जोरात ढकललं आणि खुशबू चालत्या ट्रेनमधून खाली पडली.
ट्रेनमधून खूशबू थेट एका नाल्यात जाऊन पडली. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. छातीच्या हाडांना आणि पायांना गंभीर इजा झाली. गावकऱ्यांनी तिला पाहिलं आणि RPF ला माहिती दिली. पोलिसांनी वेळ न घालवता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
हा सगळा प्रकार सांगण्यासाठी नशिबानं खूशबु जिवंत होती. तिनं शंकरचा हा डाव पोलिसांना सांगितला. सध्या पोलिस शंकरचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. शंकरनं प्रेम विवाह करुन देखील खुशबुसोबत तो असा का वागला? या मागचं कारण समोर आलेलं नाही. पण हे प्रकरण खरोखरच धक्कादायक आहे आणि एखाद्याच्या मनात धडकी भरवणारं आहे.